‘महाराष्ट्राला दिशाभूल करण्याचे प्रयत्न सोडा’, फॉक्सकॉन प्रकल्पांवरून आदित्य ठाकरेंनी फडणवीसांना सुनावले

Mumbai – राजकीय क्षेत्रात सध्या महाराष्ट्रातील बरेचसे महत्वाचे प्रकल्प परराज्यात गेले असल्याने त्याचीच चर्चा आहे. यावरून विरोधी पक्षनेते सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका करत आहेत. अशात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी आज (३१ ऑक्टोबर) पत्रकार परिषद घेत विरोधकांवरच निशाणा साधला आहे. महाराष्ट्रातून बाहेर राज्यात गेलेले सर्व प्रकल्प महाविकास आघाडीच्या काळातच गेले असल्याचे फडणवीस यांनी सांगितले आहे. मात्र आता माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनीफडणवीस यांनी दिलेली माहिती खोटी असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

आज संध्याकाळी पत्रकार परिषद घेत आदित्य ठाकरेंनी फडणवीस यांनी महाराष्ट्राबाहेर गेलेल्या प्रकल्पांवरून महाविकास आघाडीवर केलेले आरोप खोटे असल्याचे सांगितले आहे. फडणवीसांनी पत्रकार परिषदेत नमूद केलेला ‘फॉक्सकॉन प्रकल्प’ (Foxcon Project) आणि ‘वेदान्त फॉक्सकॉन प्रकल्प’ (Vedanta Foxcon Project) पूर्णपणे वेगळे असल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.

याबाबत सविस्तर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, “पत्रकार परिषदेत एवढे खोटे बोलल्याचे मी कधीही ऐकले नव्हते किंवा पत्रकार परिषदेतून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचे पाहिले नव्हते. देवेंद्र फडणवीसांना त्यांच्या टीमकडून चुकीची माहिती मिळाली आहे. फडणवीसांनी उल्लेख केलेला प्रकल्प जानेवारी २०२० मध्ये महाराष्ट्रातून बाहेर गेला आहे. हा प्रकल्प २०१६ साली देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात ‘मॅग्नेटीक महाराष्ट्र’ योजनेतून महाराष्ट्रात आला होता. ही फॉक्सकॉनची कंपनी असून महाराष्ट्रात मोबाईल निर्मिती करणार होती.”

“पुढे या प्रकल्पाने तामिळनाडूमध्ये चाचपणी केली आणि हा प्रकल्प अमेरिकेत गेला. आता त्याठिकाणी उत्पादन सुरू आहे. हा प्रकल्प जरी फॉक्सकॉन कंपनीचा असला तरी यामध्ये आणि वेदान्त फॉक्सकॉन प्रकल्पामध्ये जमीन आस्मानाचा फरक आहे. वेदान्त फॉक्सकॉनचा प्रकल्प ‘सेमीकंडक्टर चिप’साठी होता. फडणवीसांनी पत्रकार परिषदेत उल्लेख केलेला प्रकल्प ‘मोबाईल’ फोनसाठी होता. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना माझी विनंती असेल की, कृपा करून महाराष्ट्राला दिशाभूल करण्याचे सोडून द्या. महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न सोडून द्या. दोन्ही वेगळे प्रस्ताव आहेत,” अशी गंभीर टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे.