‘संतोष बांगर यांना मंत्रीपद मिळालं तर राज्यात मटक्याला अधिकृत परवानगी मिळेल’

हिंगोली – राज्यात सध्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या जोरदार चर्चा सुरु आहेत. यातच आता मंत्रिपद नेमके कुणाला मिळणार याबाबत उलटसुलट चर्चा सुरु असताना शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांना मंत्रीपद मिळालं तर महाराष्ट्रामध्ये मटक्याला अधिकृत परवानगी मिळेल अशी जहरी टीका  विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केली आहे.

मागील काहीच दिवसांपूर्वी संतोष बांगर यांनी पुढील मंत्रिमंडळ विस्तारामध्ये मला शंभर टक्के मंत्रीपद मिळेल अशी माहिती दिली होती. त्यांच्या या वक्तव्यावर अंबादास दानवेंनी प्रतिक्रिया दिली.दरम्यान, सध्याच्या सरकारइतकं अपयशी सरकार राज्यात कधीच राहीलं नाही. राज्यात भ्रष्टाचार सुरु आहे. शेतकऱ्यांचे कोणतंही काम होत नाही. शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. अतिवृष्टीची मदत देखील अद्याप झाली नाही. त्यामुळं हे सरकार महाराष्ट्राला अधोगतीकडे नेणारं सरकार असल्याची टीका दानवेंनी केली.