कोथरूडचे सद्य नेते माझ्या सारख्यांचे अस्तित्वच मिटवून टाकण्याच्या प्रयत्नात आहेत का? मेधा कुलकर्णींचा सवाल

पुणे : पुण्यातील चांदणी चौकातील प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पाचे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शनिवार 12 ऑगस्ट रोजी उद्घाटन होणार आहे. पुणे – बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे चांदणी चौकात सतत होणारी वाहतूककोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. मात्र या उद्घाटनाआधीच भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे.

कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी  (Medha Kulkarni ) यांनी याच मुद्द्यावरून स्थानिक भाजप नेत्यांवर तसेच अप्रत्यक्षपणे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. याबाबत त्यांनी सोशल मिडीयावर एक भली मोठी पोस्ट लिहिली असून आपल्यावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडली आहे.

माजी आमदार मेधा कुलकर्णी यांची पोस्ट

असे निष्ठावंतांचे डावललेले जिणे 

माझ्यावरील कुरघोडया, डावलणे याबद्दल मी कधी जाहीर वाच्यता केली नव्हती. विश्वासात न घेता अचानक निर्णय घेतले तेव्हाही.. पण आता दुःख मावत नाही मनात.. वाटले बोलावे तुमच्याशी. चांदणी चौक उद्घाटन कार्यक्रमाची कोथरूडमधील पत्रके पहिली आणि खूप वाईट वाटले.

चांदणी चौक या विषयाचे सर्वस्वी श्रेय नितीन गडकरीजी आणि देवेंद्र फडणवीस यांना आहे. पण मुळातच त्यांच्याकडे हा विषय नेला कोणी? स्वतः आदरणीय गडकरीजी काही वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात जाहीर भाषणात म्हणाले की,  तत्कालीन आमदार मेधा कुलकर्णी ताईंच्या सांगण्यावरून मी हा मुद्दा घेतला.

अनेक असे संदर्भ देता येतील की ज्यात ‘कोथरूडचे आधुनिक कुठलेच नेते’ या विषयी सहभागी नव्हते, तेव्हापासून सतत पाठपुरावा केला होता. आता मात्र सर्व श्रेय एकट्याचेच असल्यासारखे वागणारे कोथरूडचे सद्य नेते.. माझ्या सारख्यांचे अस्तित्वच मिटवून टाकण्याच्या प्रयत्नात आहेत का?

मध्यंतरी आदरणीय मोदी जी, आदरणीय अमित शाह जी पुण्यात येऊन गेले. ठराविक लोकांना प्रोटोकॉल सोडून ‘सर्व ठिकाणी’ चे पास होते. मी राष्ट्रीय पदावर असून, विनंती करूनही मला दिला नाही. साधे कोथरूड च्या मंडल अध्यक्ष पदाच्या प्रक्रियेतही समाविष्ट श्रेणी मध्ये मी अपेक्षित नसेन तर याचा अर्थ स्थानिकांना मी नको आहे. गेली अनेक वर्षे मी हे सहन करीत आहे. त्या त्या वेळी गोष्टी वरीष्ठांपुढे मांडल्या आहेत.

देशापुढील आव्हाने, त्यासाठी करायचे अपेक्षित संघटन सोडून, तसेच मा मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी एकदिलाने कार्य करायचे सोडून, हे स्वतःच्या स्वार्थासाठी विघटनाचे, काटाकाटीचे राजकारण करत आहेत. माझ्या सारख्या निष्ठावान कार्यकर्तीला जाणीव झाली की माझी काही किंमत नाही आहे.

माझ्या बाबत त्यांना असे करणे सोपे जाते. माझ्याकडे ना मसल पॉवर, ना मनी पॉवर. मी एका सामान्य कुटुंबातून आलेली, विचारधारा घरून निष्ठेने काम करणारी कार्यकर्ती आहे. एका वैचारिकतेतून राजकारणात प्रवेश केला. आणि अगदी मनापासून सर्व समाजातील लोकांची कामे केली. आजही जे सोपवले आहे ते करीतच आहे.
त्यावर असा बोळा फिरवला जातो आहे हे आता मात्र असह्य होऊन गेले आहे.