तेलंगणात बीआरएसची वस्तुस्थिती उघड!: अशोकराव चव्हाण

Ashok Chavan: तेलंगणातील बीआरएसचे राज्य सरकार (Telangana Election Results) केवळ सवंग प्रसिद्धीसाठी घोषित केलेल्या योजनांवर आणि अवास्तव प्रसिद्धीवर तगले होते. जाहिरातीत भलेही गुलाबी चित्र रंगवले जात होते, मात्र वस्तुस्थिती काळीकुट्ट होती. कधी ना कधी खरे चित्र समोर येणारच होते आणि वस्तुस्थिती लक्षात आल्यानंतर मतदार काँग्रेसच्या पाठीशी भक्कमपणे उभे झाले, असे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी म्हटले आहे.

चार राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया देताना ते बोलत होते. चव्हाण म्हणाले की, बीआरएसने शेतकऱ्यांना वर्षाला केवळ १० हजार रुपये देऊन इतर सर्व योजना जवळपास संपुष्टात आणल्या. तेलंगणात मोफत पीककर्ज नव्हते, पीकविमा नव्हता, एमएसपीनुसार शेतमाल खरेदीसाठी यंत्रणा नव्हती, खासगी खरेदीदारांकडून शेतकऱ्यांचे शोषण सुरु होते, त्यातून मोठ्या संख्येने शेतकरी आत्महत्येच्या घटना घडत होत्या. सिंचन प्रकल्पांवरील खर्च वाढवून भ्रष्टाचार सुरू होता. राज्याची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली होती. सरकारी मंडळे, महामंडळे, शासकीय योजनांसाठीच नव्हे तर कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार द्यायलाही बीआरएसच्या राज्य सरकारकडे पैसा नव्हता. कर्ज काढून, सरकारी जमिनी विकून आणि अंदाधुंद पद्धतीने दारू दुकानांचे परवाने वाटून तेथील राज्य सरकार दिवस पुढे ढकलत होते. रोजगार निर्मिती, शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेकडे पूर्ण कानाडोळा करण्यात आला होता. त्यामुळेच तेलंगणाच्या मतदारांनी बीआरएसला नाकारून काँग्रेसला स्पष्ट बहुमताने निवडून दिले.

मध्यप्रदेश, छत्तिसगड आणि राजस्थानचे निकाल आमच्यासाठी अनपेक्षित आहेत. राजस्थानमध्ये अशोक गहलोत व छत्तीसगडमध्ये भुपेश बघेल या दोन्ही मुख्यमंत्र्यांनी चांगली कामे केली, चांगल्या योजना राबवल्या. दोघांचीही प्रतीमा उत्तम होती. या तीन राज्यातील निकालांचे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडून विश्लेषण करून उणिवा शोधल्या जातील व दुरुस्तही केल्या जातील, असे अशोकराव चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

महत्वाच्या बातम्या-

तीन राज्यातील विजय ही लोकसभा विजयाची नांदी- धीरज घाटे

विधानसभा निवडणुकीतील जनतेचा कौल मान्य, लोकसभेला चित्र बदलून काँग्रेसच विजयी होईल – नाना पटोले

मोदींच्या गॅरेंटीवर जनतेचा अढळ विश्वास; चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा