टक्केवारीच्या राजकारणाची राष्ट्रवादीची परंपरा भाजपने पुढे सुरू ठेवली – आप

पिंपरी – चिंचवड –  दि. ५ जून रोजी पिंपरी चिंचवड मधील पाटीदार भवन येथे पक्षाचा स्वराज्य मेळावा मोठ्या जल्लोषात पार पडला. आप चे महाराष्ट्र राज्य निवडणूक प्रमुख महादेव नाईक, राज्य अध्यक्ष रंगा राचुरे, राज्य संघटक व पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार, राज्य सचिव धनंजय शिंदे, युवाध्यक्ष अजिंक्य शिंदे, आप वाहतूक विंग महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्रीकांत आचार्य, पुणे जिल्हा अध्यक्ष मुकुंद किर्दत, युवा उपाध्यक्ष संदीप सोनावणे, पिंपरी चिंचवड कार्यकारी अध्यक्ष चेतन बेंद्रे, आप पिंपरी चिंचवड प्रमुख अनुप शर्मा व इतर अनेक पदाधिकारी यावेळी मंचावर उपस्थित होते या सोबतच शहरातल्या अनेक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं या वेळी आम आदमी पक्षा मधे प्रवेश केला. या मेळाव्यात निवडणूक प्रभारी महादेव नाईक,प्रदेशाध्यक्ष रंगा राचुरे, संघटनमंत्री विजय कुंभार, सचिव धनंजय शिंदे आदी प्रमुख वक्त्यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे मुख्य वक्ते रंगा राचुरे यांनी प्रस्थापित पक्षांच्या विरोधात तोफ डागत,स्थानिक तसेच राज्य पातळीवर सरकारच्या अकार्यक्षमतेची जाणीव करून दिली,मुख्य मुद्द्यांना बगल देत धार्मिक तेढ निर्माण करत सामाजिक वातावरण बिघडवून आपली अकार्यक्षमता झाकण्याचा प्रयत्न सरकारे करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

आप तर्फे केल्या जाणाऱ्याकामांची माहिती देत राज्य आणि देश पातळीवर पक्षाची होत असलेली वाढ सांगत,स्थानीक पातळीवर देखील पक्षाने लोकांचे प्रश्न हाती घेत घराघरा पर्यंत पोहोचावं असं कार्यकत्यांना आवाहन केलं. निवडणुकीच्या निमित्ताने विविध आंदोलने व कार्यक्रम हाती घेत, सामान्य जनते पर्यंत पक्ष आणि त्याचा विचार पोहोचवण्याचा आदेश त्यांनी पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना दिला. उपस्थित जनसमुदायाशी संवाद साधत, आपल्या कुटुंबाच्या उज्वल भवितव्यासाठी जनतेने आम आदमी पक्षाला सत्तेवर आणावे असे आवाहन यावेळी त्यांनी केले.

पिंपरी चिंचवड-ज्या नागरिकांच्या कराच्या पैशांतून महानगरपालिकेचा  कारभार चालतो,त्या नागरिकांना दर्जेदार सेवा वेळेत देणे,हे आमचे परम कर्तव्य आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारभारात येथील करदात्या सुजाण,सुविद्य तसेच श्रमिक जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आम आदमी पार्टी बांधील आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टक्केवारीच्या राजकारणावर टीका केली मात्र टक्केवारीच्या राजकारणाची परंपरा राष्ट्रवादी ची आणि तीच परंपरा भाजपने पुढे सुरू ठेवली त्यामुळे कमिशन आणि टक्केवारी साठी स्मार्ट सिटीचे प्रकल्प राबवताना कोणतेही निर्धारित मुदतीची बंधने नाहीत,आणि अनेक प्रोजेक्ट  प्रलंबित आहेत.त्याचे खर्च वाढविले जातात.भाजप आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्ष टक्केवारीसाठीच काम करत आहेत.असा आरोप चेतन बेंद्रे यांनी केला आहे.

सर्वोपचार मोफत आरोग्य सेवा,पूर्ण दाबाने चोवीस तास शुद्ध पाणी पुरवठा,परिपूर्ण सुरक्षित रस्ते,सरकारी घरकुल योजना आणि निवारा हक्क इ मूलभूत प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी ‘नागरिकांची सनद’ आम्ही जनतेसमोर सादर करणार आहोत.शहरातील नागरिकांनी आम आदमी पार्टीला येत्या निवडणुकीत विजयी करावे,असे आवाहन कार्यकारी अध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी निगडी येथील स्वराज्य निर्धार मेळाव्यात केले.