हा आक्रोश मोर्चा नसून हा तर थयथयाट मोर्चा; भातखळकर यांची मविआवर टीका

मुंबई – संत सज्जन आणि महापुरुषांचा अपमान करत काढलेला मोर्चा हा आक्रोश मोर्चा नसून सत्तेची खुर्ची गेल्यानंतर होणारा थयथयाट आहे, त्यामुळे हा थयथयाट मोर्चा असल्याची टीका भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर (BJP Atul Bhatkhalkar) यांनी केली.

कांदिवली पूर्व येथे भाजपाच्या वतीने माफी मांगो आंदोलनात ते बोलत होते. आमदार  भातखळकर म्हणाले सुषमा अंधारे आणि संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील संत सज्जन आणि महापुरुषांचा अपमान केला आहे, त्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. ज्या संत ज्ञानेश्वर माऊलींनी 12 व्या शतकात विज्ञानाधिष्ठित मानवतेची आणि समभावाची शिकवण दिली, संत तुकाराम महाराजांनी समाजाला दिशा दिली त्यांचा अपमान करणाऱ्या सुषमा अंधारे यांची उद्धव ठाकरे यांनी हकालपट्टी करावी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतातील प्रत्येकासाठी प्रति परमेश्वर आहेत त्यांचाही संजय राऊत आणि अमोल मिटकरी यांनी अपमान केला आहे, त्यानंतर साधा खुलासा आणि माफी सुद्धा मागितली नाही हा त्यांचा माज जनता उतरल्याशिवाय राहणार नाही.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा सन्मान करण्याचे काम भाजपने केले आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर सर्वप्रथम राष्ट्रपती भवनात शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळा सुरू झाला आहे.