‘पवार साहेब, जनता योग्य वेळी धडा शिकवेल, तुम्ही पावसात भिजूनही…’; भाजपचा टोला  

 मुंबई –   महाविकास आघाडीच्या युवा आमदारांनी काल सकाळी शरद पवार यांची त्यांच्या घरी भेट घेतली. यावेळी  सुमारे 2 तास शरद पवार यांनी या आमदारांशी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली.पाच राज्यांच्या निवडणूक निकालांबाबत आमदारांनीही आपल्या मनातील प्रश्न शरद पवार यांच्यासमोर ठेवले. बैठक आटोपल्यानंतर आमदार निघून जात असताना शरद पवार उभे राहिले, दोन्ही हात धरून मुठ घट्ट धरली आणि म्हणाले की घाबरण्याची गरज नाही, आम्ही राज्यात भाजपची सत्ता येऊ देणार नाही.

पुढे बोलताना ते म्हणाले,  भाजप त्यांचा राजकीय प्रतिस्पर्धी असेल, पण त्यांच्या अनेक नेत्यांकडून शिकण्यासारख्या गोष्टी आहेत, हे मतही शरद पवार यांनी या तरुण आमदारांसमोर व्यक्त केले आहे. विशेषत: 24 तास काम करण्याची तयारी, योजनांचे मार्केटिंग आणि निवडणुकीची रणनीती असे अनेक गुण भाजप नेत्यांकडून शिकायला हवेत. यासोबतच शरद पवार यांनी तरुण आमदारांना सहकार क्षेत्र आणि सामाजिक क्षेत्रात उतरण्याचा मंत्रही दिला.

दरम्यान, शरद पवारांच्या या विधानावर भाजपाकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. “आदरणीय शरद पवार साहेब..कोण येणार? कोण नाही हे सर्व महाराष्ट्रातील जनता ठरवते. लोकशाहीत जनता सर्वश्रेष्ठ असते, तुम्ही नाही. जनतेने भाजपला १०५ जागा दिल्या. तुम्ही पावसात भिजूनही त्याच्या अर्धे आमदारही निवडून आणू शकला नाहीत. जनमताचा अनादर करणाऱ्यांना जनता योग्य वेळी धडा शिकवेल”, अशा शब्दांत महाराष्ट्र भाजपाच्या ट्विटर हँडलवरून शरद पवारांवर निशाणा साधण्यात आला आहे.