बारावीच्या उत्तर पत्रिकांबाबत तातडीने बैठक घेणार आशिष शेलार यांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई – बारावीच्या विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिका तपासल्या जात नसल्याने याबाबत तातडीने एक बैठक घेऊन तोडगा काढला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली.

राज्यातील बारावीच्या परिक्षां सुरु असून विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिका(Answer Sheet) तपासल्या जात नाहीत त्या पडून आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. यातील काही विद्यार्थी परदेशात शिक्षणासाठी जाणारे असतात त्यांच्या उत्तर पत्रिका वेळेत तपासल्या गेल्या नाहीत तर निकालाला विलंब होईल म्हणून शासनाने याबाबत तातडीने लक्ष देण्याची गरज आहे, अशी विनंती आमदार अँड आशिष शेलार यांनी विधानसभेत केली.

याबाबत विधानसभा अध्यक्ष अँड राहुल नार्वेकर यांनी दखल घेत हा विषय गंभीर असून सरकारने तातडीने दखल घ्यावी, असे निर्देश दिले. सभागृहात शिक्षणमंत्री उपस्थितीत नव्हते त्यामुळे स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत दखल घेतली. या विषयावर तातडीने बैठक घेऊन तोडगा काढला जाईल, शासन विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.