‘सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाने अनाथनाचा आधारवड हरपला असून एका संघर्ष पर्वाचा अंत झाला आहे’

नाशिक :- अनाथांचा आधार असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचे वयाच्या ७३ व्या वर्षी ह्दयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. अतिशय दुःख झाले. सिंधुताई सपकाळ यांच्या आकस्मित निधनाने अनाथांचा आधार हरपला असल्याच्या शोकभावना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या आहे.

छगन भुजबळ यांनी शोकसंदेशात म्हटले आहे की, स्वतःचं दुःख बाजूला सारून दुसऱ्यांचे डोळे पुसणाऱ्या काळजातील आभाळ माया अनाथांच्या जगावर पांघरणाऱ्या माईंचे कार्य अतिशय मोलाचे होते. हजारो अनाथ मुलांच्या आश्रयदात्या म्हणून त्यांना २०१२ साली डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारही मिळाला होता. तसेच नुकतच त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

आपल्या संपूर्ण आयुष्यभरात ७५२ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार ही त्यांच्या कार्याची पोचपावती होती. अतिशय संघर्षाच्या अशा परिस्थितीत त्यांच्या आयुष्यातील बराचसा काळ गेला. त्यांच्या निधनाने अनाथनाचा आधारवड हरपला असून एका संघर्ष पर्वाचा अंत झाला आहे. मी व माझे कुटुंबिय सपकाळ यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना करतो असे छगन भुजबळ यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.