‘गाडीवर चप्पल भिरकावणारे लोक कोण होते मला माहित नाही, फालतू, चिल्लर लोक असतील’ 

मुंबई – राजकीयदृष्ट्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना रोखणे अवघड होत असल्याने आता राष्ट्रवादी कॉंग्रेस पातळी सोडू लागली आहे का असा सवाल आज नाविलाजाने उपस्थित करण्याची वेळ आली आहे. कारण पिंपरी चिंचवडमध्ये माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या गाडीवर चप्पल भिरकावल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये विकासकामांच्या उद्घाटनासाठी देवेंद्र फडणवीस आले असताना हा प्रकार घडला आहे. अटल बिहारी वाजपेयी उद्यानात प्रवेश करताना ही धक्कादायक घटना घडली. फडणवीसांचा विरोध दर्शवण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजीही केली. यावेळीच फडणवीस यांच्या गाडीवर चप्पल फेकण्यात आली.दरम्यान,  या घटनेनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हे लोक कोण होते मला माहित नाही, फालतू, चिल्लर लोक असतील, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. कोणी काळे, निळे, पिवळे कोणतेही झेंडे दाखवू दे. जनता बघतेय, ते फक्त स्वतःचं अस्तित्व दाखविण्यासाठी हे करत आहेत. एखादं चांगलं काम करून श्रेय घ्या, पण कामं करायची नाहीत अन दुसऱ्यांसमोर निदर्शन करायची. देव त्यांना सुदबुद्धी देवो. अण्णा साहेब पाटलांच्या आणि अटल बिहारी वाजपेयींच्या नावाच्या उद्यान समोर आंदोलन करण्याची जागा काँग्रेस आणि राष्ट्रवादीने निवडली. मला यांच्या बुद्धीची कीव येते, हे दुर्दैव्य आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.