ओबीसी राजकीय आरक्षणाची कत्तल महाविकास आघाडी सरकारनं केली – देवेंद्र फडणवीस 

मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाजप ओबीसी मोर्चाच्या (BJP OBC front) मेळाव्यात ओबीसी राजकीय आरक्षणावरुन (OBC Political Reservation) महाविकास आघाडी सरकारवर टीका केल महाविकास आघाडी सरकारनं (MVA) ओबीसी आरक्षणाचा खून केल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होणं हे दुर्दैवी असल्याचं ते म्हणाले.

या बैठकीत ओबीसी आरक्षणा मिळेपर्यंत भाजप २७ टक्के तिकीटं ओबीसींना देणार असल्याची घोषणा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. भाजप ओबीसी मोर्चानं महाविकास आघाडी सरकारचा (Mahavikas Aghadi government) बुरखा फाडला आहे. तुम्ही सरकारचा ओबीसी विरोधी चेहरा जनतेसमोर आणला आहात आणि रस्त्यावर सातत्यानं ओबीसींच्या प्रश्नावर मार्ग काढण्यास भाग पाडलं आहे, असंही फडणवीस म्हणाले.

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा खून महाविकास आघाडी सरकारनं केला आहे. ओबीसी राजकीय आरक्षणाची कत्तल महाविकास आघाडी सरकारनं केली आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. जनतेने राज्य सरकार आणि महाविकास आघाडीचे षडयंत्र ओळखले पाहिजे, असेही फडणवीस म्हणाले. तत्कालीन काँग्रेस सरकारनेही (Congress government) ओबीसींकडे दुर्लक्ष केले असून, त्यांच्याकडून ओबीसींचा वापर केवळ दिखाव्यापुरताच केला गेल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे.