देवेंद्र फडणवीस तर सत्ताप्रेमाने आंधळे झालेले कलियुगातील धृतराष्ट्र; सुषमा अंधारे यांची टीका 

मुंबई : मुंबई महानगरपालिकेवर आपला झेंडा फडकविण्यासाठी भाजपने शर्थीचे प्रयत्न सुरु केले आहेत. यासाठी भाजपकडून संघटन मजबूत केले जात असून विविध मेळावे आयोजित केले जात आहेत. यातच नुकत्याच एका मेळाव्यात  भाजप नेते आशिष शेलार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना  भगवान श्रीकृष्णाची उपमा देऊन टाकली.

यावरूनच आता शिवसेनेत नव्याने दाखल झालेल्या सुषमा अंधारे यांनी भाजपवर टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) तर सत्ताप्रेमाने आंधळे झालेले कलियुगातील धृतराष्ट्र आहेत, अशी टीका शिवसेनेच्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केली आहे. केवळ सत्तेसाठी भाजपा अशाप्रकारची भाषा वापरत असल्याची टीका त्यांनी केली आहे.

त्या म्हणाल्या, की एक धृतराष्ट्र पुत्रप्रेमाने आंधळे होते, तर आताचे धृतराष्ट्र सत्ताप्रेमाने आंधळे झाले आहेत. सत्तेआधी ज्यांच्यावर त्यांनी ढिगाने आरोप केले होते, त्यांच्या मांडीला मांडी लावून खुर्चीच्या प्रेमापोटी सत्तेत बसलेले आहेत. ज्यांना संकटातून बाहेर काढले असे म्हणतायत, ते कर्ण नाहीत, तर ते दुःशासनाच्याही पुढचे लोक आहेत, अशी टीका त्यांनी केली आहे.