देवेंद्र फडणवीस यांच्या ‘त्या’ वक्तव्याची आम्हाला कोणतीही भीती नाही – रोहित पवार 

कोल्हापूर – राज्याच्या राजकारणात एकामागून एक भूकंप घडत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे मात्र शांत असल्याचे चित्र आहे. मात्र आता याच देवेंद्र फडणवीस यांनी एक लक्ष्यवेधी वक्तव्य केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मी पुन्हा येईन असा नारा फडणवीस यांनी दिला आहे.  चंदगडमध्ये (Chandgad) बोलताना ते म्हणाले की, मी पुन्हा येईन म्हटलं की येतोच. मी कसा येतो हे तुम्हाला देखील माहित आहे. आपलं कुलदैवतच नरसिंह आहे. आपण कुठूनही प्रगती करतो असं फडणवीस यांनी म्हटले आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीसांच्या या वक्तव्यावर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी यावर भाष्य केले आहे. ते म्हणाले, “देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’ या वक्तव्याची आम्हाला कोणतीही भीती नाही. याची खरी भिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाटायला पाहिजे. कारण, देवेंद्र फडणवीस पुन्हा येईन म्हणतात, पण ते कोणत्या पदावर येतील, याचं उत्तर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी द्यावं”असं पवार यांनी म्हटले आहे.