‘लढवय्ये नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा खोटा गुन्हा शिंदे – फडणवीस सरकारने दाखल केला ?’

मुंबई   – आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर जाणूनबुजून व सुडबुद्धीने विनयभंगाची कारवाई करण्यात आली असून जितेंद्र आव्हाड यांच्या पाठीशी संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली. कळवा – मुंब्रा उड्डाण पुलाच्या उद्घाटनप्रसंगी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांवर श्रेयवादाची टिका केली होती त्यातूनच ही कारवाई झाली आहे असेही महेश तपासे म्हणाले.

राज्यघटनेच्या संरक्षणार्थ आवाज उठवणारे लढवय्ये नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा खोटा गुन्हा शिंदे – फडणवीस सरकारने दाखल केला आहे. ज्या महिलेने व्हिडीओ दिला आहे तो मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम आहे. त्यात इतकी गर्दी आहे की, स्वतः वाट काढत आणि पोलीसही त्यांना पुढे जाण्यासाठी सर्वांना बाजुला करत आहेत हे दिसत आहेत. त्यात ती महिलाही आहे. अशावेळी विनयभंगाचा गुन्हा होतो का हा जनतेच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे असेही महेश तपासे म्हणाले.

राज्यसरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात जितेंद्र आव्हाड हे आवाज उठवत आले आहेत. भूमिका मांडत आले आहेत. त्यामुळे हात लावून कुणाला बाजूला केले असेल तर तो विनयभंगाचा गुन्हा दाखल होतो का? याची माहिती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी आधी करुन घ्यावी असा सल्लाही महेश तपासे यांनी दिला आहे.