आम्ही युतीत होतो म्हणून तुम्ही मुख्यमंत्री झालात, हे विसरू नका; जानकरांचं फडणवीसांना उत्तर

सांगली – मला मंत्री केल्याचं आपण सांगताय. पण आम्ही युतीत होतो म्हणून तुम्ही मुख्यमंत्री झालात, हे विसरू नका, अशा शब्दात रासपचे नेते महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना उत्तर दिलं आहे. देवेंद्र फडणवीस अनेक वेळा सभांमधून रासपला मंत्रिपद दिल्याचा उल्लेख करतात. मला त्यांना सांगायचंय, तुम्ही मंत्रिपद दिलं म्हणजे आमच्यावर काही उपकार केले नाहीत, असं ते म्हणाले.

ते म्हणाले, आम्ही तुमच्यासोबत होतो. आमचा पक्ष भाजपसोबत युतीत होता. त्यामुळे तुम्ही युतीचे मुख्यमंत्री होता. यात आमचाही वाटा आहे. काँग्रेस आणि भाजप या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. फोडा झोडा आणि राज्य करा, ही त्यांची निती आहे. छोट्या पक्षांची त्यांना काहीही किंमत नाही. छोट्या पक्षांक्षी दोस्ती करुन एकदा सत्ता उपभोगली की त्यांना सोडून द्यायचं हेच दोन्ही पक्षांचं धोरण आहे, मी स्वत: अनुभवलं आहे”, असंही जानकर म्हणाले.

सब समान, देश महान या धोरणाने वाटचाल सुरू आहे. काँग्रेस आणि भाजपची धोरणे वेगळी आहेत. आमदार, खासदार फोडणे, वापरणे आणि सोडून देणे, हेच त्यांचे धोरण आहे. काँग्रेसने स्वातंत्र्याचा लढला आणि भाजपने फळे चाखली. आम्ही फक्त पालखीचे भोई राहिलो. दोन्ही पक्ष बहुजनांचे नाहीत. आज शाहू महाराजांच्या वंशजाला मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर यावे लागते तर धनगर समाजाला खासदार- सभापती पदं दिल्यावर ते येड्यागत पळतंय. समाज मात्र आहे तिथेच आहे असं देखील ते म्हणाले.