उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी कणखर भूमिका घेतल्यामुळे प्रतापगडावरची अतिक्रमणे हटली – नितेश राणे

मुंबई – प्रतापगडावर अफझलखानाच्या कबरीजवळची अतिक्रमणे हटविण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले गेले. कणखर भूमिका घेत ही अतिक्रमणे हटविल्याबद्दल महाराष्ट्राच्या शिवप्रेमी जनता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांचे अभिनंदन करीत आहे, असे प्रतिपादन आ. नितेश राणे (Nitesh Rane) यांनी शुक्रवारी केले. भाजपा प्रदेश कार्यालयासमोर झालेल्या सभेत आ. राणे बोलत होते. अफझलखानाच्या कबरीजवळची अतिक्रमणे हटविल्याबद्दल या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भाजपा प्रदेश कोषाध्यक्ष आ. मिहीर कोटेचा, प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, भारतीय जनता युवा मोर्चा मुंबईचे अध्यक्ष तेजिंदर तिवाना आदी यावेळी उपस्थित होते.

आ.राणे म्हणाले की, प्रतापगडावरील अफझलखानाच्या कबरीजवळची अतिक्रमणे हटविण्याची मागणी अनेक दिवसांपासून होते आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राजकारण करणाऱ्या पक्षांनी या मागणीकडे दुर्लक्ष केले. शिवप्रेमींच्या भावनेचा अनादर केला. हिंदुत्ववादी म्हणविणाऱ्या पक्षांनीही या मागणीकडे लक्ष दिले नव्हते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही अतिक्रमणे हटविण्याची ठाम भूमिका घेतली. याबद्दल महाराष्ट्र उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा आभारी आहे .

महाराष्ट्रात धार्मिक स्थळे, ऐतिहासिक स्थळांच्या ठिकाणी अतिक्रमणे झाली आहेत. विशाळगड, मुंबईतील शिवडीचा किल्ला अशा ठिकाणी झालेली अतिक्रमणे यापुढील काळात हटविली जातील. हिंदूंच्या धार्मिक स्थानांकडे यापुढे वाकड्या नजरेने पाहिले तर ते सहन केले जाणार नाही, असेही आ. राणे यांनी सांगितले.