या सरकारमध्ये मंत्र्यांचंच चालत नसेल, तर यावर आपण वेगळं काय बोलणार? – Rohit Pawar

Chagan Bhujbal speech in jalana : राष्ट्रवादीचे फायरब्रांड नेते छगन भुजबळ ( Chagan Bhujbal ) यांच्या नेतृत्वात जालन्यातल्या अंबडमध्ये शुक्रवारी ओबीसी एल्गार महासभेचं आयोजन करण्यात आलं होतं.यावेळी भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil)यांच्यावर टीका केली आहे.

यावेळी जालन्यात पोलिसांवर झालेल्या हल्ल्यावरून देखील छगन भुजबळ यांनी राज्य सरकारसह मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. जरांगे पाटील यांनी उपोषण केलं. त्यावेळी पोलिसांचा लाठीमार झाला. पोलिसांचा लाठीमार सर्वांनी पाहिला. पण 70 पोलीस जखमी झाले. महिला पोलीसही जखमी झाल्या. त्यांना रुग्णालयात दाखल केले. हे सर्व पोलीस दगडांचा मार खावून जखमी झाले. जरांगेंना उठवायला पोलीस गेले होते. त्यावेळी मी झोपलोय नंतर या, असं जरांगे म्हणाले. त्यामुळे पोलीस गेले. याने गच्चीवरून सर्व तयारी केली होती. पोलीस जेव्हा त्यांचं उपोषण सोडवायला गेले. तेव्हा दगडांचा मारा सुरू झाला. पटापट पोलीस जमिनीवर पडले. 70 पोलीस काय पाय घसरून पडले का?; असा सवाल राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केला.

दरम्यान, छगन भुजबळ यांनी शरद पवार गटाचे आमदार राजेश टोपे (Rajesh Tope) आणि रोहित पवार(Rohit Pawar) यांच्यावरही टीकास्र सोडलं. “लाठीमार झाल्यानंतर हे शूर सरदार (मनोज जरांगे) घरात जाऊन झोपले होते. त्यांना आमचे अंबडचे मित्र राजेश टोपे आणि दुसरे आमचे मित्र रोहित पवार यांनी रात्री तीन वाजता घरातून उठवून आणलं आणि आंदोलन करण्यासाठी बसवलं. शरद पवार आंदोलनस्थळी येणार आहेत, असं त्यांना सांगितलं. त्यानंतर शरद पवारांनाही तिथे आणलं,” असा आरोप छगन भुजबळ यांनी केला आहे.

दरम्यान, भुजबळांच्या या आरोपांवर रोहित पवारांनी प्रत्युत्तर दिलं. छगन भुजबळ हे स्वत: मंत्री आहेत. मंत्री असताना त्यांना मंत्रीपदाचा योग्य वापर करता येत नसेल, या सरकारमध्ये मंत्र्यांचंच चालत नसेल, मंत्र्यांचंच ऐकलं जात नसेल, तर यावर आपण वेगळं काय बोलणार? राहिला प्रश्न त्यांच्या वक्तव्याचा तर योग्य वेळ आल्यानंतर मी स्वत: यावर स्पष्टीकरण देईन, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

महत्वाच्या बातम्या-