‘खोके सरकारवर उद्योजकांचा विश्वास नाही त्यामुळे चांगले प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर जात आहेत’

मुंबई – वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पानंतर (Vedanta-Foxconn project) आता आणखी एक प्रकल्प गुजरातला गेला आहे. नागपूरला होणारा C-295 लष्करी ट्रान्सफोर्ट एअरक्राफ्ट प्रकल्प गुजरातमधील वडोदरा  येथे होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते 30 ऑक्टोबर रोजी वडोदरा येथे या प्रकल्पाचे भूमिपूजन होणार आहे. यावरून राज्यात आरोप-प्रत्योरापाच्या फैरी झडत आहेत. वेदांता-फॉक्सकॉन, बल्क ड्रग्ज पार्क या दोन प्रकल्पानंतर तिसरा प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारवर चहुबाजूने टीका सुरू झाली आहे.

दरम्यान, आता या मुद्द्यावरून माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्रातील चार प्रकल्प राज्याबाहेर गेले. त्यामुळे तरुणांचं मोठं नुकसान झालं आहे. उदय सामंतानी (Uday Samant) एअरबस हा प्रकल्प महाराष्ट्रात आणू असं सांगितलं होतं. त्यांनी महाराष्ट्रातील तरुणांशी त्यांनी गद्दारी का केली?, याचा अर्थ राज्याचे मंत्री खोटं बोलत आहेत का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

एखादा करार जर कोणत्या राज्यासोबत झाला तर तो प्रकल्प दुसऱ्या कोणत्याही राज्यात जाऊ शकत नाही. हे आपल्याला माहित आहे तरीही महाराष्ट्रात एअरबस हा प्रकल्प आणू असं सांगत होते, असाही आरोप त्यांनी मंत्री उदय सामंतांवर केला आहे. या खोके सरकारवर अनेक उद्योजकांचा विश्वास नाही त्यामुळे चांगले प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर जात आहे, असाही आरोप त्यांनी केला आहे.