सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीला विरोध करणारे शेतकऱ्यांचे शत्रू आहेत; संजय राऊतांचा हल्लाबोल

मुंबई – राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातल्या सुपर मार्केटमध्ये आता वाईनची विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे. हा प्रस्ताव आधी विचाराधीन होता. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याबद्दलचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, या निर्णयामुळे राज्य सरकार टीकेची धनी बनले आहे. शिवरायांच्या महाराष्ट्राला मद्यराष्ट्र बनवले जात असल्याचे सांगत विरोधकांसह सामाजिक कार्यकर्ते आणि सुजाण नागरिक या निर्णयावर टीका करत आहेत. महत्वाचं म्हणजे सोशल मिडीयावर देखील सरकारच्या या निर्णयाविरोधात संतापाची लाट उसळली आहे. या निर्णयावरुन अनेकांनी सरकारला ट्रोल केलंय. मात्र, सरकारकडून या निर्णयाचे समर्थन करत फायदे सांगण्यात येत आहेत.

याबाबत खा. संजय राऊत म्हणाले, सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीला विरोध करणारे शेतकऱ्यांचे शत्रू आहेत. वाईन विक्रीतून जर चांगल्या पद्धतीने विक्री वाढून निर्यात वाढली तर शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल. त्यातून शेतकऱ्यांच्या मालाला भाव चांगला मिळेल. शेतकऱ्यांचं उत्पन्न देखील वाढेल. हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताशी संबंधित आहे. जे राजकीय पक्ष याचा विरोध करत आहेत, त्यांनी याचा विचार करावा. त्यांनी शेतकऱ्याचं आर्थिक गणित समजून घ्यावं, असेही राऊत यांनी म्हटले.