जेनेलियाचं करिअर देशमुख कुटुंबामुळे संपलं? अभिनेत्रीने केला मोठा खुलासा; म्हणाली…

अभिनेता रितेश देशमुख (Reteish Deshmukh) आणि त्याची पत्नी आणि अभिनेत्री जेनेलिया डिसूझा देशमुख (Genelia Deshmukh) हे चित्रपटसृष्टीतील सर्वात क्यूट कपल मानले जाते. दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडते. हे दोघे शेवटचे ‘वेड’ या मराठी चित्रपटात एकत्र दिसले होते, पण त्याआधी जेनेलियाने लग्नानंतर बरीच वर्षे काम केले नाही. यादरम्यान रितेश आणि त्याच्या कुटुंबीयांनी जेनेलियाला चित्रपटात काम करण्यास मनाई केली होती, असे बोलले जात होते. त्याचवेळी आता जेनेलिया या प्रकरणावर उघडपणे बोलली आहे.

रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खानच्या ‘व्हॉट वुमन वॉन्ट’ या चॅट शोमध्ये सहभागी झाले होते. यादरम्यान बेबोने जेनेलियाने चित्रपटांमधून बराच काळ ब्रेक घेतल्याबद्दल प्रश्न विचारला, ज्यावर अभिनेत्रीने उत्तर दिले की, लग्नापूर्वी ती हिंदी, तेलुगू आणि तमिळ चित्रपटांमध्ये खूप दिवस काम करत होती, पण लग्नानंतर तिला कुटुंबाला प्राधान्य द्यायचे होते, तो तिचा स्वतःचा निर्णय होता.

अभिनेत्रीने सांगितले की, जेव्हा तिने चित्रपटांमधून ब्रेक घेतला तेव्हा तिला लोकांच्या अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागले. रितेशचे वडील राजकारणात असल्याने देशमुख कुटुंबीयांनी तिची फिल्मी कारकीर्द संपवली, अशी लोकांची समजूत होती, परंतु अभिनेत्रीने त्या वेळी स्पष्ट केले होते की असे अजिबात नाही. अभिनेत्री म्हणाली की, अनेकांनी तिला विचारले की रितेशने तिला चित्रपटांमध्ये काम न करण्यास सांगितले आहे का? तेव्हा तिने सत्य सांगितले होते की तिला दीर्घकाळ काम केल्यानंतर इंडस्ट्रीतून ब्रेक घ्यायचा आहे.