शासकीय कार्यालयातील कर्मचारी, अधिकाऱ्यांना विना हेल्मेट दुचाकी वाहन चालवणे पडणार महागात

हिंगोली : शासकीय कार्यालयामध्ये कामानिमित्त येणारे बहुतांशी नागरिक तसेच कार्यालयातील कर्मचारी, अधिकारी हे विना हेल्मेट दुचाकी वाहन चालवित असल्याबाबत निदर्शनास येत आहे. वाहन चालविताना हेल्मेटचा वापर करणे हे रस्ता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचे आहे. बहुतांशी दुचाकी वाहनांच्या अपघातामध्ये जखमी होणारे अथवा मृत पावणारे वाहनस्वार हे हेल्मेटशिवाय प्रवास करणारे असतात, असे दिसून आले आहे. यासाठी हेल्मेट वापरण्यासंबंधी प्रबोधनात्मक व अंमलबजावणी संबंधी व्यापक मोहिम प्रत्येक जिल्ह्यात राबविण्याचे आदेश राज्याचे परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे (dr. Avinaash Dhaakne) यांनी दिले आहेत.

त्याअनुषंगाने हिंगोली जिल्ह्यातील सर्व दुचाकी वाहन चालविणारे नागरिक, कर्मचारी, अधिकारी या वाहन धारकांनी शासकीय कार्यालयात येताना विना हेल्मेट दुचाकी वाहन चालविताना आढळून आल्यास त्यांच्यावर मोटार वाहन कायद्यांतर्गत मोटार वाहन विभाग तसेच स्थानिक पोलीस यंत्रणेमार्फत योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे अनंता जोशी (Ananta Joshi), उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.