राज्यपालांचं विधान चुकीचं नाही, मी त्यांच्या वक्तव्याचे समर्थन करतो – आंबेडकर

मुंबई :  राज्यपाल भगतसिह कोश्यारी (Governor Bhagatsih Koshyari) यांनी मुंबईतील कार्यक्रमात बोलताना गुजराती आणि राजस्थानी नागरिकांचे कौतुक केले. मात्र यावेळी त्यांनी मुंबईवर वादग्रस्त वक्तव्य केले. मुंबईतून राजस्थानी आणि गुजराती माणसांना काढून टाका, ही मुंबई आर्थिक राजधानी राहणारच नाही. तुमच्याकडे पैसा राहणारच नाही, असे वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शुक्रवारी केले.

मुंबई ठाण्यातील व्यवसाय हे गुजराती आणि राजस्थानी माणसांच्या हातात आहेत. त्यामुळे मुंबई आणि ठाण्यातील आर्थिक नाड्या  या माणसांच्या हातात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गुजराती आणि मारवाडी माणसांचे मुंबईच्या विकासात योगदान असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, राज्यपालांनी मुंबईबाबत केलेल्या विधानावर (Bhagat Singh Koshyari Statment) सडकून टीका होत असताना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मात्र या विधानाचं समर्थन केलं आहे. राज्यपालांचं विधान चुकीचं नाही, त्यांनी महाराष्ट्रातील नेत्यांच्या राजकारणाला उघडं पाडलं, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. राज्यपालांच्या विधानाबाबत त्यांना विचारण्यात आलं. त्यांनी टीव्ही 9 मराठीसोबत खास बातचित केली. तेव्हा त्यांनी कोश्यारी यांच्या विधानाचं समर्थन केलं.

“राज्यपालांचं वक्तव्य चुकीचं नाही. मी त्याच्या विधानाचं समर्थन करतो. राज्यपालांच्या वक्तव्याने महाराष्ट्राचा अपमान झाला नाही. उलट राज्यातील नेत्यांचं राजकारण उघडं पाडलं. राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये प्रस्थापित नेत्यांच्या डोळ्यावरची झापडं उघडली”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलंय. राज्यपालांची उचलबांगडी करण्याची गरज नाही. राज्यपाल जे बोललेत ती सत्य परिस्थिती आहे, असं आंबेडकर म्हणालेत.