संभाजी ब्रिगेडसोबत युतीचा शिंदे गटावर काय परिणाम? गुलाबराव पाटील म्हणाले…

Mumbai – शिवसेना (shivsena) आणि संभाजी ब्रिगेडनं (sambhaji brigade) राज्यातील आगामी सर्व निवडणुका एकत्रित लढवण्याची काल घोषणा केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे (Shiv Sena chief Uddhav Thackeray and Sambhaji Brigade president Manoj Akhre) यांनी मुंबईत पत्रकारांना ही माहिती दिली. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्रित मेळावे देखील घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. ही वैचारिक युती असल्याचं ठाकरे यावेळी म्हणाले. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या एकत्र येण्यानं एक चांगलं समीकरण तयार होईल, अशी आशा आखरे यांनी व्यक्त केली.

दरम्यान, हिंदुत्व विरोधी संघटनेशी हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाने युती केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जातंय. दुसरीकडे या युतीचा शिंदे गटावर काय परिणाम होणार यावर देखील चर्चा सुरु असताना शिंदे गटातील नेते आणि राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

निवडणुकीत दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल

गुलाबराव पाटील जळगावात बोलताना म्हणाले की, शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड युतीचा आमच्यावर कोणताही परिणाम होणार नाही. आम्ही काम करत आहोत. आगामी निवडणुकीत दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल तेव्हा कळेल, असं मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.

काम करणाऱ्या लोकांवर कुठलाही फरक पडत नाही

पाटील म्हणाले की, प्रत्येक जण आपला पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतो. त्याचप्रमाणे शिवसेनेने संभाजी ब्रिगेडसोबत युती केली आहे. काम करणाऱ्या लोकांवर कुठलाही फरक पडत नाही असं म्हणत शिंदे गटावर या युतीचा कुठलाही परिणाम होणार नाही असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. जनता ही काम करणाऱ्यांना महत्व देत असते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून चांगलं काम सुरू आहे. त्यामुळे शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडचे युतीची आम्हाला कुठलीही फिकीर नाही, असेही मंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.