‘कॉंग्रेस आपल्या उमेदवारावर विश्वास टाकू शकत नाही तर मग त्यांच्यावर जनता कसा विश्वास टाकणार?’

मुंबई – जागांच्या बाबतीत अनेक राज्यांच्या तुलनेत गोवा अगदीच लहान असला तरी येथील पक्षांतराचे राजकारण मात्र देशभर चर्चेचा विषय बनत असते. या राज्यात विजयापेक्षा नेत्यांच्या पक्षांतराचा प्रश्न आहे, म्हणून काँग्रेस सध्या मंदिर, मशिदी, चर्चच्या फेऱ्या मारत असल्याचे दिसत आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये या पक्षांतराचा सगळ्यात जास्त फटका कॉंग्रेस पक्षाला बसला होता.विशेष म्हणजे आता निवडणूक जाहीर होऊन आणि उमेदवारांच्या याद्या जाहीर होत असतानाही अनेकजण पक्षबदल करत आहेत. बऱ्याच काळ पक्षातून आउटगोइंग सुरु असताना आता संधी पाहून पुन्हा काही नेते मंडळी कॉंग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. आता याच दलबदलू नेत्यांच्या भरवश्यावर आता कॉंग्रेस गोव्याच्या निवडणुकीत उतरली आहे.

दरम्यान, आगामी काळातील संभाव्य धोका लक्षात घेत कॉंग्रेसकडून सर्व उमेदवारांकडून पक्षांतर न करण्याचे वचन घेण्यात आले. काँग्रेसच्या सर्व उमेदवारांनी निवडणुकीनंतर पक्षांतर करणार नसल्याची शपथ देवी महालक्ष्मी आणि बांबोळी येथील क्रॉससमोर घेतली. निवडणूक झाल्यानंतरही आपण पक्षाशी एकनिष्ठ राहणार असल्याचे यावेळी सगळ्यांनी शपथ घेतली आहे.

दरम्यान, कॉंग्रेसला या मुद्द्यावरून आता टीकेचा सामना करावा लागत आहे. तसेच जनतेमध्ये देखील यामुळे एक वेगळ्या प्रकारचा संदेश गेला असल्याचे दिसून येत आहे. जर कॉंग्रेसला आपल्याच उमेदवारांवर विश्वास नसेल तर मग जनतेने तरी या उमेदवारांवर विश्वास का दाखवावा असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.

यासंदर्भात केशव उपाध्ये यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,गोव्यात कॉँग्रेसने उमेदवारांना चर्च, मंदिर, दर्गा येथे नेऊन निवडून आल्यावर न फुटण्याची शपथ दिली, म्हणजेच गोवा काँग्रेसचा आपल्या उमेदवारांवर विश्वास नाही ते फुटणार याची खात्री असावी म्हणून ही धडपड? जे आपल्या उमेदवारावर विश्वास टाकू शकत नाहीत त्यांच्यावर जनता कसा विश्वास टाकणार?, असा सवालही उपाध्ये यांनी केला आहे.