‘माझ्या जन्माच्या दाखल्यावर औरंगाबाद आहे, त्यामुळे माझ्या मृत्यूच्या दाखल्यावर देखील औरंगाबादच असायला हवं’

संभाजीनगर : शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीमुळे ठाकरे सरकार धोक्यात आलं. परिणामी सत्तांतर झालं त्यामुळे राहिलेल्या वेळेत ठाकरे सरकारने लोकप्रिय निर्णय घेतला असल्याचे पाहायला मिळाले. याआधी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील (D.B. Patil) यांचं नाव देण्याबाबत मुख्यमंत्री सकारात्मक होते. त्यानंतर गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेच्या अजेंड्यावर असलेला संभाजीनगरचा (Sambhajinagar)  विषय मार्गी लावण्यात आला.उस्मानाबाद शहराचं देखील नाव ‘धाराशीव’ (Dharashiv) करण्याचा प्रस्ताव मंजूर केला. आता महाराष्ट्रात सत्तांतर झालं असून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचं सरकार अस्तित्वात आलं आहे.

1988 मध्ये औरंगाबादच्या (Aurangabad) सभेत दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी पहिल्यांदा हा औरंगाबादचे नाव संभाजीनगर असा नारा दिला होता. तेव्हापासून औरंगाबादेत शिवसेनेकडून औरंगाबादचे संभाजीनगर असा शहराचा उल्लेल केला जातो. 9 नोव्हेबर 1995 या वर्षात राज्यात युतीचे सरकार आल्यानंतर औरंगाबादचे नाव संभाजीनगर असे नामकरण करण्यासाठी प्रस्ताव औरंगाबाद महापालिकेने पाठवला. मात्र 2001 साली तो काँग्रेस आघाडी सरकाने रद्द ठरवला. आता शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत असताना संभाजीनगरचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला होता.

दरम्यान, औरंगाबादच्या नामांतरावरून एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (MP Imtiaz Jalil) आक्रमक झालेले दिसून येत आहेत. नामांतराला विरोध करण्यासाठी त्यांनी सर्वपक्षीय बैठक घेतली. ते म्हणाले, नामांतरणाचा मुद्दा हा हिंदू-मुस्लिमांचा मुद्दा आहे. आम्ही संभाजी महाराजांचा (Sambhaji Maharaj) आदर करतो. पण सत्तेत बसलेल्या पक्षाच्या एका नेत्याने २५-३० वर्षापूर्वी औरंगाबादमध्ये येऊन औरंगाबाद शहराचं नामकरण व्हायला पाहिजे, अशी इच्छा व्यक्त केली.

त्या नेत्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही नामांतराचा अन्याय सहन का करायचा ? असा प्रश्नही जलील यांनी यावेळी उपस्थित केला. त्यामुळे नामांतराच्या मुद्यावरून आता राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. सर्वपक्षीय बैठकीत बोलताना ते म्हणाले की, माझ्या जन्माच्या दाखल्यावर औरंगाबाद आहे, त्यामुळे माझ्या मृत्यूच्या दाखल्यावर देखील औरंगाबादच असायला हवं.

पुढे बोलताना ते म्हणाले की, औरंगाबादच्या नामकरणाच्या वेळी आपण शांत बसलो, तर येणाऱ्या पिढ्या आपल्याला प्रश्न विचारतील, शहराचं नामकरण होतं असताना तुम्ही काय करत होता. त्यामुळे नामकरणाला विरोध झालाच पाहिजे. याप्रकरणी आपण न्यायालयात (Court) जाणार असल्याचंही जलील यांनी सांगितलं. याशिवाय गरज पडली तर नामातरणाच्या मुद्द्यावरून रस्त्यावर उतरू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.