टीम इंडियाला मोठा झटका, T20 मालिकेपूर्वी ‘हा’ गोलंदाज झाला जखमी

Avesh Khan Injury: भारताने अलीकडेच वेस्ट इंडिजविरुद्धच्या T20 मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे. टीम इंडियाने वेगवान गोलंदाज आवेश खानला संधी दिली आहे. त्याने भारतासाठी 15 टी-20 आणि 5 एकदिवसीय सामने खेळले आहेत. पण टीम इंडियासाठी एक वाईट बातमी आली आहे. आवेश जखमी झाला आहे. तो दुलीप ट्रॉफी 2023 मध्ये मध्य विभागाकडून खेळत आहे. पश्चिम विभागाविरुद्ध सुरू असलेल्या सामन्यात आवेशला दुखापत झाली.

आवेशने इंडियन प्रीमियर लीगमध्ये अनेक वेळा चांगली कामगिरी केली आहे . या लीगमध्ये त्याने 55 विकेट घेतल्या आहेत. स्पोर्टस्टारच्या वृत्तानुसार, आवेशला खांद्याला दुखापत झाली आहे. याच कारणामुळे तो सामन्याच्या दुसऱ्या दिवशी क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरला नाही. कॅच घेताना तो जखमी झाला. या डावात त्याने 11 षटके टाकली आणि 26 धावा दिल्या. आवेशनेही एक विकेट घेतली. सध्या तरी आवेशच्या दुखापतीबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

विशेष म्हणजे, आवेशने टीम इंडियासाठी आतापर्यंत 15 सामने खेळले आहेत आणि या कालावधीत त्याने 13 विकेट घेतल्या आहेत. 18 धावांत 4 बळी घेणे ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. आवेशने टीम इंडियासाठी 5 वनडेही खेळले आहेत. यामध्ये त्याने 3 विकेट्स घेतल्या आहेत. आवेशने आतापर्यंत आयपीएलमध्ये 47 सामने खेळले असून त्यात त्याने 55 विकेट घेतल्या आहेत. त्याची आयपीएलमधील सर्वोत्तम कामगिरी म्हणजे 24 धावांत 4 विकेट्स घेणे ही आहे.