अमोल मिटकरी यांच्यामुळे आली जयंत पाटलांवर दिलगिरी व्यक्त करण्याची वेळ

मुंबई – मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS chief Raj Thackeray) यांनी राष्ट्रवादीवर केलेला जातीयवादाचा आरोप किती अचूक आहे याचा नुकताच प्रत्यय सांगलीच्या सभेत आला आहे. या सभेत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (NCP MLA Amol Mitkari) यांची चांगलीच नौटंकी पाहायला मिळाली. नौटंकी तर ते नेहमीच करतात मात्र यावेळी त्यांनी सभेत बोलताना त्यांनी हिंदू परंपरांची (Hindu traditions) आणि पुरोहित (Priest) वर्गाची खिल्ली उडवली आहे.

विशेष म्हणजे एका समाजाची खिल्ली उडवली जात असताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Water Resources Minister Jayant Patil) आणि मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) स्टेजवर उपस्थित होते. पुरोहित वर्ग विविध कार्यांमध्ये मंत्र उच्चारण करतो त्याची खिल्ली अमोल मिटकरींनी उडवली. हनुमान स्तोत्र, कन्यादान विधी आदींचे मंत्र उच्चारूनसुद्धा त्यांनी खिल्ली उडवली, त्यावेळी जयंत पाटील आणि धनंजय मुंडे यांना आपले विकट हास्य आवरले नाही. पाटील- मुंडे या जेष्ठ नेत्यांनी त्यांना अजिबात रोखण्याचा प्रयत्न केला नाही. उलट ते सुद्धा हसत हसत त्यांना दाद देताना दिसून आले.

यामुळे राज्यभरात पुरोहित संघटना संतप्त झाल्या असून आमदार अमोल मिटकरींवर टीका करत आहेत.असा कोणताही मंत्र कन्यादान सोहळ्यात वापरला जात नाही असं सांगण्यात येत आहे. पुढे मिटकरी यांनी हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या कन्यादान (kanyadan) या शब्दाची आणि विधीची देखील खिल्ली उडवली त्यावेळी सुद्धा मुंडे आणि पाटील हसत होते असं दिसतंय. एखाद्या विशिष्ट समाजाविषयी, हिंदू परंपरे विषयी राष्ट्रवादी काँग्रेस सारख्या महाराष्ट्रव्यापी पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांनी या पद्धतीने वर्तणूक करावी याविषयी सोशल मीडियातून प्रचंड नाराजी देखील व्यक्त होत आहे.

भाजपानं देखील यासंदर्भात टीकेचा सूर लावला असताना अमोल मिटकरी यांनी मात्र आपण माफी मागणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यासंदर्भात सविस्तर भूमिका मांडली आहे. तसेच, माझ्या व्यासपीठावर ते वक्तव्य झालं, असं म्हणत त्यांनी दिलगिरी देखील व्यक्त केली आहे. अमोल मिटकरींच्या विधानामध्ये बरेच विनोद होते. पोट धरून बरेच लोक हसत होते. त्यावेळी लग्नविधीदरम्यानच्या मंत्राचा उल्लेख त्यांनी केला. त्यानंतर मी देखील माईकवर टॅप करून त्यांना भाषण थांबवण्याची सूचना केली. ते त्यांचं वैयक्तिक विधान आहे. त्यांची ती मतं असतील , असं जयंत पाटील म्हणाले.

ब्राह्मण समाजाला दुखावण्याचा हेतू त्या सभेचा नव्हता. त्यांच्या वक्तव्यामुळे भावना दुखावल्या असतील तर त्याचा मला खेद वाटतोय. आमची ती भूमिकाच नव्हती. असं वक्तव्य होणं योग्य नव्हतं. त्यांच्या वक्तव्यामध्ये ब्राह्मण समाजाचा उल्लेख नाही. पण मंत्रपठण वगैरेमुळे ब्राह्मण समाजात एक भावना तयार झाली आहे. मी सर्व ब्राह्मण समाजाला विनंती करेन की आमचा तो हेतू नाही. ब्राह्मण समाजासाठी आम्हाला सर्वांनाच आपुलकीची भावना आहे. त्याबाबत आमची कुणाचीही टोकाची भूमिका नाही. माझ्या व्यासपीठावर ते भाष्य झालं, त्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करणं आवश्यक आहे, असं जयंत पाटील यावेळी म्हणाले.