Jalna Lathicharge Case  : सुप्रिया ताई, सत्तेच्या हव्यासापोटी महाराष्ट्र पेटवू नका; चित्रा वाघ यांची विनंती

Jalna Lathicharge Case : – जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातल्या अंतरवाली सराटी इथं मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाला काल संध्याकाळी हिसंक वळण लागलं. या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता. यावेळी मोठी गर्दी जमल्याने पोलिसांनी लाठीमार केला. तसंच संतप्त जमावानेही दगडफेक केली, यात काही आंदोलक आणि पोलीस कर्मचारीही जखमी झाले.

दरम्यान आंदोलनाच्या वेळी झालेल्या लाठीमाराची घटना अत्यंत दुर्दैवी आहे, त्याची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी दिली आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याची राज्य सरकारची प्रामाणिक भूमिका आहे, असं सांगून नागरिकांनी शांतता राखावी, असं आवाहन त्यांनी केलं.

दरम्यान, या मुद्द्यावरून आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule ) यांनी अतिशय संतप्त अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलीसांनी लाठीचार्ज केला.‌ हे अतिशय संतापजनक आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या भुलथापा देऊन भाजपाने मते घेतली परंतु आरक्षणाच्या बाबतीत मराठा समाजाला केवळ आश्वासने देण्यापलीकडे भाजपाने काहीही केले नाही, ही वस्तुस्थिती आहे.

मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याबाबत आमची भूमिका स्पष्ट आहे. परंतु भाजपाने यासंदर्भात सातत्याने संभ्रम वाढविणारी भूमिका घेतली. केंद्र आणि राज्यात एकाच पक्षाचे, विचारांचे सरकार असूनही आरक्षण दिले जात नाही हि खेदाची बाब आहे.मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यांवर लाठिहल्ला करुन भाजपा सरकारने समाजाची क्रूर फसवणूक केली आहे. भाजपाने मराठा समाजाची याबद्दल माफी मागितली पाहिजे. या लाठीहल्ल्याच निषेध.अशी टीका सुळे यांनी केली आहे.

दरम्यान, या टीकेला भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या, ओ मोठ्ठ्या ताई @supriya_sule मराठा समाजासाठी ‘मगरमच्छ के आंसू’ ढाळण्यापेक्षा तुम्ही खरंच प्रयत्न केले असते तर आज संपूर्ण मराठा समाज तुमचा आभारी राहीला असता.मराठा आरक्षणावरून फक्त राजकीय पोळी भाजून घ्यायचं एवढेच तुमच्या सिलॅबस मध्ये आहे का ? तुमचा सत्तेत राहण्याचा स्ट्राईक रेट अतिशय उत्तम असल्याचा अभिमान आहे मग मराठा आरक्षण प्रश्न सोडवण्याचा स्ट्राईक रेट कमी असल्याचा कधी खेद का वाटला नाही ? मराठा समाजाला आरक्षण देण्याची हिम्मत का दाखविली नाही आपण?

ताई, ट्रिपल टेस्ट पूर्ण करणं, सामाजिक मागासलेपण सिद्ध करणं आणि कोर्टात लढाई लढणं या सगळ्या गोष्टी देवेंद्र फडणवीस जी यांनी केल्याआहेत.पण तुमचा प्रॅाब्लेम वेगळा आहे. देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करणं हे तुमचं लक्ष्य आहे. राष्ट्रवादी पक्षातील काही मंत्र्यांनी तुमची साथ सोडली म्हणून तुमची जळजळ होणं स्वाभाविक आहे. पण त्याचा राग काढण्यासाठी मराठा आंदोलकांच्या खांद्याचा वापर करू नये, ही विनंती आहे.

तुमच्या कार्यकाळात तुम्ही मावळ मध्ये प्रकल्पग्रस्तांवर गोळीबार केला होता. त्यात मृत्युमुखी पडलेल्या शेतकरी बांधवांचे रक्त तुमच्या हाताला लागले आहे. समाजकल्याणाच्या कामात तुमची रक्तपिपासू वृत्ती उफाळून येते, हा इतिहास आहे. आता मराठारक्षणाचा खोटा कळवळा दाखवताय? तेव्हा बंदुकीचा चाप ओढताना मात्र तुम्हाला कर्तव्यधर्माचा सोईस्कर विसर पडला होता. तेव्हा तुमच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला नाही.

आत्ता ही महाराष्ट्र इतके दिवस शांत होता मग आत्ताच कसा काय पेटतोय याची सुद्धा चौकशी व्हायला पाहीजे. जर हे जाणून बुजून घडवलं जात असेल तर त्याचाही छडा लागायला पाहीजे. ताई, सत्तेच्या हव्यासापोटी महाराष्ट्र पेटवू नका ही नम्र विनंती…

येथे वाचा संबंधित बातम्या

भाजपाने मराठा समाजाची माफी मागितली पाहिजे; सुप्रिया सुळे कडाडल्या

मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज; शरद पवारांनी सांगितलं याला नेमकं कोण आहे जबाबदार