भाजपाने मराठा समाजाची माफी मागितली पाहिजे; सुप्रिया सुळे कडाडल्या

Maratha Reservation – जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातल्या अंतरवाली सराटी इथं मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाला काल संध्याकाळी हिसंक वळण लागलं. या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता. यावेळी मोठी गर्दी जमल्याने पोलिसांनी लाठीमार केला. तसंच संतप्त जमावानेही दगडफेक केली, यात काही आंदोलक आणि पोलीस कर्मचारीही जखमी झाले.
दरम्यान आंदोलनाच्या वेळी झालेल्या लाठीमाराची घटना अत्यंत दुर्दैवी आहे, त्याची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी दिली आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याची राज्य सरकारची प्रामाणिक भूमिका आहे, असं सांगून नागरिकांनी शांतता राखावी, असं आवाहन त्यांनी केलं.

दरम्यान, या मुद्द्यावरून आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule ) यांनी अतिशय संतप्त अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलीसांनी लाठीचार्ज केला.‌ हे अतिशय संतापजनक आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या भुलथापा देऊन भाजपाने मते घेतली परंतु आरक्षणाच्या बाबतीत मराठा समाजाला केवळ आश्वासने देण्यापलीकडे भाजपाने काहीही केले नाही, ही वस्तुस्थिती आहे.

मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याबाबत आमची भूमिका स्पष्ट आहे. परंतु भाजपाने यासंदर्भात सातत्याने संभ्रम वाढविणारी भूमिका घेतली. केंद्र आणि राज्यात एकाच पक्षाचे, विचारांचे सरकार असूनही आरक्षण दिले जात नाही हि खेदाची बाब आहे.मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यांवर लाठिहल्ला करुन भाजपा सरकारने समाजाची क्रूर फसवणूक केली आहे. भाजपाने मराठा समाजाची याबद्दल माफी मागितली पाहिजे. या लाठीहल्ल्याच निषेध.अशी टीका सुळे यांनी केली आहे.

येथे वाचा आणखी बातम्या

इतिहास घडवण्यासाठी भारत सज्ज; आदित्य-L1 च्या प्रक्षेपणाची उलट गणती सुरू

Maratha Reservation : आंदोलनाच्या वेळी झालेल्या लाठीमाराची घटना अत्यंत दुर्दैवी – शिंदे

मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज; शरद पवारांनी सांगितलं याला नेमकं कोण आहे जबाबदार