‘शिवसेना या संकटातून निश्चित बाहेर पडेल, सर्वसामान्य शिवसैनिक पक्षाबरोबरच’

नाशिक – हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Hinduhriday Samrat Balasaheb Thakre) यांच्या विचारांचा स्वतःला खरा वारसदार मानणाऱ्या शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पक्षनेतृत्वाच्या विरोधात बंडाचा झेंडा हाती घेतला आहे. एकनाथ शिंदे, शिवसेनेच्या ३४ सोबतच ७ अपक्ष अशा एकुण ४१ आमदारांसह गुवाहाटीमध्ये आहेत. शिंदे यांनी दिलेल्या दणक्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. २५ वर्षे राज्य आमचंच राहील असा दावा काही नेत्यांकडून केला जात असताना शिंदे यांच्या यॉर्करमुळे हे नेते त्रिफळाचीत झाल्याचे दिसत आहे.

राज्यात राजकीय भूकंप (Political earthquake) घडवणाऱ्या शिवसेनेतील आजवरच्या सर्वात मोठ्या बंडानं ठाकरे सरकार (Thackeray Gov) अडचणीत आलं आहे. याचवेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत अनेक आमदार असल्याची चर्चा आहे. शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांची भूमिकाही आता समोर आली आहे. त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबरचं सरकार अमान्य असल्याचं कळत आहे भाजपसोबत (BJP) जाण्यास हे नेते इच्छुक आहेत अशी भूमिका बंडखोर आमदारांनी घेतल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री (CM) स्वतःकडे नगरविकास मंत्रीपद ठेवायचे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thakre) यांनी तसे केले नाही. असे असताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thakrey) यांचा मुलगा उद्धव ठाकरे यांना पाच वर्षे मुख्यमंत्री पदी का पाहवत नाही? असा सामान्य कार्यकर्त्यांना भेडसावणारा प्रश्‍न आहे, असे शिवसेनेचे (Shivsena) ज्येष्ठ नेते जयंत दिंडे (Jayant Dinde) यांनी म्हटलं आहे.

शिवसेनेवर असे आघात अनेकदा झाले आहेत. ते पचवुनच आम्ही वाटचाल केली आहे. आज देखील शिवसेना या संकटातून निश्चित बाहेर पडेल. जे लोक राज्यातील सरकार पडावे यासाठी देव पाण्यात बुडवून बसले आहेत, समाज एक दिवस त्यांना अशा वाईट गोष्टींबद्दल निश्चित जाब विचारील. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना या संकटातून देखील तावून सुलाखून बाहेर पडेल. कारण सर्वसामान्य शिवसैनिक (Shiv Sainik) पक्षाबरोबरच आहे. असं ते म्हणाले.