‘दिल्लीत वाऱ्या… फुटीरांमधील मतभेद…या व्यापात सरकारला ओबीसी आरक्षणाकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही’

मुंबई – दिल्लीत वाऱ्या करणे… फुटीरांमधील मतभेद मिटवणे… त्यांच्या समजूती घालणे, उपमुख्यमंत्री पद मिळाल्याने भाजपमधील एक गट अस्वस्थ आहे. या सगळ्या व्यापात सध्याचे सरकार व्यस्त आहे. म्हणून ओबीसी आरक्षणाकडे लक्ष देण्यासाठी सरकारकडे वेळ नाही असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केला आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे सरकार येऊन २५ पेक्षा जास्त दिवस झाले तरी राज्याला मंत्रिमंडळ नाही याबाबत जयंत पाटील यांनी नाराजी व्यक्त केली.

महाविकास आघाडीने स्थापन केलेल्या बांठिया आयोगाने सुप्रीम कोर्टात (Supreme Court) अहवाल सादर केला आणि त्या अहवालामुळे ओबीसींना आरक्षण(OBC eservation) मिळाले मात्र सरकारला त्यावर लक्ष देता आले नाही. सरकार दिल्ली वाऱ्यांमध्ये जरजर झाले असल्यामुळे दुर्लक्ष झाले नाहीतर ९२ नगरपालिकांमध्ये आरक्षण मिळाले असते असेही जयंत पाटील म्हणाले.

वर्धा, नांदेड, यवतमाळ महाराष्ट्राच्या अनेक भागात पूरपरिस्थिती आहे. मात्र सध्या पालकमंत्री नसल्याने तिथे ठामपणे कोणी उभे राहत नाही. मदतकार्याला कोणतेही प्रशासकीय नियंत्रण नाही. म्हणून मदतकार्य नीट होत नाही. अनेकांचे संसार उद्धवस्त झाले मात्र अश्रू पुसण्यासाठी कुणीही नाही असेही जयंत पाटील म्हणाले.