शरद पवारांवर केलेल्या आंबेडकरांच्या विधानावरून जितेंद्र आव्हाडांचा इशारा; म्हणाले, सहन करणार…

मुंबई- काही दिवसांपूर्वीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडी या पक्षांमध्ये युती झाली. या युतीनंतर राज्यात पुन्हा शिवशक्ती आणि भिमशक्ती एकत्र आल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा शिवसेना पक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासमवेत महाविकास आघाडीचा घटक आहे. त्यामुळे या युतीवरुन महाविकास आघाडीत धुसफूस सुरू आहे. अशातच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबद्दल खळबळजनक (Prakash Ambedkar On Sharad Pawar) विधान केले आहे.

शरद पवार हे आजही भाजपासोबत आहेत असा दावा  प्रकाश आंबेडकर यांनी केल्याने राज्यात नव्या चर्चांना तोंड फुटले आहे. तसेच आमचा महाविकास आघाडीशी काहीही संबंध नाही. आमची युती ही शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंशी आहे, असेही यावेळी प्रकाश आंबेडकरांनी म्हटले आहे.

शरद पवारांबद्दल बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी एका वृत्ताचा दाखला दिला. ते म्हणाले की, अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जाऊन सरकार स्थापन केल्यानंतर मुलाखत दिली होती. तेव्हा अजित पवार म्हणाले होते की, मला लोक दोष का देतात? हे तर आमच्या पक्षाचे ठरले होते. मी फक्त सर्वात आधी गेलो. हे लोकसभे आधीच आमचे ठरले होते. हा दाखला देत प्रकाश आंबेडकर यांनी थेट शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.

दरम्यान, त्यांच्या या दाव्यावर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाष्य केले आहे. प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या विधानावर प्रत्युत्तर देताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, महाविकास आघाडी मधील घटक पक्षातील नेतृत्वाने किंवा त्यांच्या मित्रपक्षातील नेतृत्वाने शरद पवार साहेबांबद्दल बोलताना आदराने बोलावं. मतभेद सगळ्यांचेच असतात, पण त्याच्यातून विष ओकलं जाऊ नये. हे पटण्यासारखं नाही.तेव्हा सगळ्यांनीच काळजी घ्यावी. सत्तेसाठी वाटेल ते सहन करणार नाही. असा थेट इशारा जितेंद्र आव्हाड यांनी आंबेडकरांना दिला आहे.