तक्रारी झाल्या तरी चालतील पण पंतप्रधानपदाची गरिमा घालवणाऱ्या भाजपाविरोधात बोलणारच : पटोले

मुंबई – पंतप्रधानपदाची गरीमा घालवण्याचे काम भारतीय जनता पक्ष करत आहे त्याविरोधात आम्ही बोलणारच. माझ्याविरुद्ध तक्रारी झाल्या तरी चालतील, असे प्रत्युत्तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना दिले.

यासंदर्भात बोलताना पटोले पुढे म्हणाले की, मी काल आणि आजही बोललो, पंतप्रधानपदाची गरीमा आहे. जे पंजाबमध्ये घडले त्याचा आम्ही निषेधच करतो पण जो कार्यक्रम आधी पाठवला होता तो शेवटच्या क्षणी का बदलला हा पश्न आहे.

केंद्रीय सुरक्षा विभागाने पंतप्रधानांचा कार्यक्रम आणि रस्ता ऐनवेळी बदलणे हेच चुकीचे आहे. मग हा कार्यक्रम बदलणारे कोण आहेत ?  केंद्रीय सुरक्षा यंत्रणा याला जबाबदार आहेत. पंतप्रधान ज्या रस्त्याने जाणार तिथे भाजपचे कार्यकर्ते कसे पोहचले? या प्रश्नांची उत्तरे मिळाली पाहिजेत, असे पटोले म्हणाले.