केतकी चितळेची अटक बेकायदेशीर, शरद पवार यांनी केली नव्हती तक्रार – महिला आयोग

नवी दिल्ली-   राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे (Actress Ketaki Chitale) हिला अटक करण्यात आली होती. यानंतर गेल्या काही दिवसांपासून केतकी चितळे ही विविध कारणांमुळे चर्चेत आहे.

काल केतकी चितळे हिने मुंबई उच्च न्यायालयात आपली अटक बेकायदेशीर असल्याचे म्हटले होते. त्याचवेळी राष्ट्रीय महिला आयोगाने महाराष्ट्राच्या डीजीपीला नोटीस बजावली असून, मानहानीच्या तरतुदींची अंमलबजावणी करण्याबाबत आणि प्रत्यक्ष हजर राहण्याबद्दल सात दिवसांत स्पष्टीकरण मागितले होते, त्यावर डीजीपींनी उत्तर पाठवले आहे.

राष्ट्रीय महिला आयोगाच्या प्रमुख रेखा शर्मा (Rekha Sharma) यांनी सांगितले की, समन्स पाठवल्यानंतर महाराष्ट्राच्या डीजीपींनी त्यांना कृती अहवाल पाठवला ज्यात केतकीच्या अटकेसह अनेक विसंगती आहेत. प्रकरण अदखलपात्र असूनही दंडाधिकार्‍यांच्या पूर्व परवानगीशिवाय ते दाखल करण्यात आले होते.

त्या पुढे म्हणाल्या, अभिनेत्रीवर शारीरिक अत्याचार करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी कारवाई केली नाही. बदनामीची तक्रार वैयक्तिकरित्या शरद पवार यांच्याकडून आली नव्हती, ती त्यांच्या पक्षाकडून करण्यात आली होती. जोपर्यंत संबंधित व्यक्तीकडून तक्रार येत नाही तोपर्यंत ती दखलपात्र नसते त्यामुळे कोणत्या कारणास्तव केतकीला अटक करण्यात आली? असा सवाल देखील यानिमित्ताने त्यांनी उपस्थित केला.