नांदगावपेठ परिसरात पुन्हा बिबट्या आढळला; तत्काळ शोधमोहिम राबविण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

नांदगावपेठ – नांदगावपेठ परिसरात शेतकरी बांधवांना पुन्हा बिबट्या आढळला असून, तातडीची शोधमोहिम राबवावी. बुधवारी बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना अधिकाधिक भरपाई मिळवून द्यावी, तसेच शेतकरी बांधवांच्या सुरक्षिततेसाठी तेथील परिस्थिती लक्षात घेऊन शेतीला दिवसा वीजपुरवठा करावा, असे स्पष्ट निर्देश राज्याच्या महिला बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.

पालकमंत्र्यांकडून जखमींची चौकशी गत बुधवारी नांदगावपेठनजिक संगमेश्वर परिसरातील शेतात काम करणाऱ्या मजुरांवर बिबट्याने अचानक हल्ला चढविला. या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले. तथापि, कालही परिसरात आणखी एक बिबट्या आढळून आला आहे. नागरिकांची सुरक्षितता जोपासणे अत्यावश्यक असून त्या बिबट्याचा शोध घेण्यासाठी जलद मोहिम राबविण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी वन विभागाला दिले. दरम्यान, पालकमंत्र्यांनी आज जिल्हा रूग्णालय येथे जाऊन बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या विवेक जयस्वाल यांच्या प्रकृतीची चौकशी केली व जखमींना अधिकाधिक भरपाई मिळवून देऊ, अशी ग्वाही दिली.

वनविभाग व महावितरण अधिका-यांसमवेत बैठक याप्रकरणी पालकमंत्र्यांनी वनविभाग व महावितरणची तातडीने स्वतंत्र बैठक घेतली. उपवनसंरक्षक चंद्रशेखर बाला व महावितरणचे कार्यकारी अभियंता अनिरुद्ध आलेगावकर यांच्याशी त्यांनी चर्चा केली. महावितरणचे अभियंता श्री. गावंडे, बाळासाहेब देशमुख, हरीषभाऊ मोरे, राजेश बोडखे, मुकुंद पांढरीकर, बाळासाहेब भुस्कडे, विनोद डांगे, मंगेश आवारे आदी यावेळी उपस्थित होते. वन विभागाच्या रेस्क्यू पथकाने गत बुधवारी आढळलेल्या बिबट्याला जेरबंद केल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला होता.

तथापि, गुरुवारी त्याच परिसरात दुसरा बिबट्या आढळून आला आहे. त्यामुळे शेतकरी व शेतमजूर बांधवांची चिंता वाढली आहे. या सर्वांच्या सुरक्षिततेसाठी तत्काळ शोधमोहिम हाती घ्यावी. त्याचप्रमाणे, गत बुधवारी हल्ल्यात जखमी झालेल्या बांधवांना जास्तीत जास्त मदत मिळवून द्यावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले. शेतीला दिवसा वीजपुरवठा करा परिसरात महावितरण विभागाने शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

त्या म्हणाल्या की, परिसरात शेतीला वीज पुरवठा रात्रीच्या वेळी होतो. रात्री वीजपुरवठा होत असल्याने शेतकरी-शेतमजूर बांधवांना रात्रीच्या वेळी शेतात पाणी द्यायला जावे लागते. परिसरातील वन्य प्राण्यांचा संचार पाहता ते अत्यंत धोक्याचे आहे. त्यामुळे महावितरणने तेथील परिस्थिती लक्षात घेता तत्काळ दिवसा वीज पुरवठा सुरु करावा, असे आदेश पालकमंत्र्यांनी महावितरण प्रशासनाला दिले. परिसरातील शेतकरी-शेतमजूर आणि नागरिकांनी रात्रीच्या वेळी शेतात जाणे किंवा या परिसरात जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.