पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अडचणी वाढल्या, मातब्बर नेता पक्षाची साथ सोडणार
पंढरपूर – भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षाने मराठवाडामार्गे महाराष्ट्रात पाय रोवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. तेलंगणा राष्ट्र समिती या पक्षालाच राष्ट्रीय स्तरावर बीआरएस म्हणून ओळखले जाते. ‘अब की बार, किसान सरकार’ असी घोषणा देऊन पक्षाची राष्ट्रीय पातळीवर ओळख निर्माण करण्यासाठी केसीआर यांनी तेलंगण राष्ट्र समितीऐवजी भारत राष्ट्र समिती ( BRS) असा बदल पक्षाच्या नावात केला आणि तेलंगणबाहेर पक्षविस्ताराचे मनसुबे जाहीर केले.
आता या पक्षाने अनेक मोठ्या नेत्यांना आपल्या गळाला लावायला सुरुवात केली आहे. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपुरातील नेते भागीरथ भालेक पक्षामध्ये अस्वस्थ असल्याच्या मागाच्या काही दिवसांपासून बातम्या येत होत्या. अखेर त्यावर शिक्कामोर्तब झालं आहे.भागीरथ भालके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय पक्का केलाय. ते येत्या 27 जूनला भारत राष्ट्र समिती या पक्षात प्रवेश करणार आहेत.
सध्या तेलंगणमध्ये BRS ची सत्ता आहे. बीआरएसचे प्रमुख आणि तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव उद्या महाराष्ट्रात येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत येत्या 27 जूनला भागीरथ भालके तेलंगण राष्ट्र समिती या पक्षामध्ये प्रवेश करतील. आज पंढरपुरात कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्यांनी ही घोषणा केली.