वीजेच्या अभावी शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होणार नाही याची काळजी अधिकाऱ्यांनी घ्यावी – भुजबळ

नाशिक :- गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे शेतकरी देखील अडचणींचा सामना करत असून विजेच्याबाबत निर्णय घेतांना अधिकाऱ्यांनी सहकार्याची भावना ठेवावी. वीजेच्या अभावी शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होणार नाही याची काळजी अधिकाऱ्यांनी घ्यावी. तसेच येवला मतदारसंघात देखभाल दुरुस्तीसह पायाभूत सुविधांची कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी महावितरण अधिकाऱ्यांना दिले.

येवला मतदारसंघातील विजेच्या प्रश्नांबाबत निरीक्षक दिलीप खैरे आणि पालकमंत्री यांच्या विशेष कार्य अधिकारी यांनी नुकतीच बैठक घेतली होती. यामध्ये विजेच्या प्रश्नांबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर आज पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत येवला मतदारसंघातील आढावा बैठक पार पडली. यावेळी मतदारसंघातील विजेचे प्रश्नांबाबत चर्चा करत अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

यावेळी प्रदेश निरीक्षक दिलीप खैरे, मुंबई बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर, येवला बाजार समितीचे मुख्य प्रशास वसंत पवार, पांडुरंग राऊत, बाळासाहेब लोखंडे, मुख्य अभियंता दिपक कुमठेकर,अधिक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर, अधीक्षक अभियंता सानप, कार्यकारी अभियंता सतीश बोंडे, संजय तडवी, श्री. तपासे, डी. के.आहेर, श्री.आव्हाड, गजानन ठोंबरे यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, मतदारसंघातील फिडरसह, ट्रान्सफार्मरची प्रलंबित कामे पूर्ण करण्यासोबत आठ दिवसांच्या आत अडतीस गावे पाणी पुरवठा योजनेच्या सौर प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यात यावे.अधिकाऱ्यांनी प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी करून याठिकाणी असलेल्या अडचणी तात्काळ दूर करण्यात याव्यात. महावितरणच्या कामांबाबत शासनास सादर करण्यात आलेल्या सर्व प्रस्तावांचा दैनंदिन आढावा घेण्यात घेऊन पाठपुरावा करण्याचे आदेश दिले.

यावेळी अतिशय जुन्या लाईन्स आणि जुने विद्युत पोल दुरुस्त करणे, फेल ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांना अनेक दिवस वाट बघावी लागू नये अशा सूचना करत येवला तालुक्यातील ट्रान्सफॉर्मर लवकर दुरुस्त होऊन मिळावे यासोबतच 132 के.व्ही पाटोदा (पिंप्री ) EHV सबस्टेशन महापारेषणला पाठवलेला प्रस्ताव, नगरसुल सबस्टेशन मध्ये ५ MVA चे अतिरिक्त रोहित्र बसवणे,अंगुलगाव 33 के.व्ही.सबस्टेशन,वडगाव बल्हे येथे 33 के.व्ही.सबस्टेशन, सोमठाणदेश येथे 33 के.व्ही. सबस्टेशन, जऊळके 33 के.व्ही.नवीन सबस्टेशन, पिंपळगाव जलाल 5MVA चे नवीन विद्युत उपकेंद्र सुरू करणे, येवला येथे 10 MVA चे रोहित्र बसवणे,अंदरसूल येथील सब स्टेशनमध्ये करावयाच्या कामासंदर्भात कार्यारंभ आदेश,ACF योजनेतील शेतकऱ्यांचे ओव्हरलोड ट्रांसफार्मर ज्या ठिकाणी 63 ओव्हरलोड झालेत त्या ठिकाणी 100 चे देण्यात यावेत, सर्व सबस्टेशनमध्ये महावितरण कंपनीच्या फंडातून कॅपॅसिटर बॅंक बसविण्याबाबत चर्चा करून कामे मार्गी लावण्याच्या सूचना केल्या.

तसेच निफाड तालुक्यातील दहेगाव ता.निफाड येथे 5 MVA चे विद्युत उपकेंद्र सुरू करणे, मरळगोई ता.निफाड येथे 5 MVA चे विद्युत उपकेंद्र सुरू करणे, खडक माळेगाव ता.निफाड येथे 5 MVA चे विद्युत उपकेंद्र सुरू करणे किंवा खानगाव ता निफाड विद्युत उपकेंद्रात 5 MVA चे अतिरिक्त रोहित्र बसवणे, मानोरी ता. निफाड येथील फिडर वेगळे करणे,महावितरण कार्यालय इमारती, अधिकारी कर्मचारी निवासस्थाने या विविध प्रलंबित विषयांवर चर्चा करून तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना केल्या.

यावेळी चार वर्षांपासून येवला मतदार संघात वीज वितरण कंपनीकडून चार दिवस रात्री व तीन दिवस दिवसा यामध्ये बदल करून ज्या गावांना रात्रीचे शेड्युल आहे त्यांना दिवसाची वीज देण्यात यावी अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शेड्युलमध्ये बदल करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.