रब्बी हंगामासाठी पीक स्पर्धेचे आयोजन; जाणून घ्या या स्पर्धेसाठी नेमकी काय आहे नियमावली

पुणे :- शेतकऱ्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी स्पर्धात्मक वातावरण निर्मिती करणे व त्यांना प्रोत्साहन देणे यासाठी रब्बी हंगाम 2021 पीकस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पीकस्पर्धेसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2021 आहे.

पीकस्पर्धेमध्ये रब्बी हंगामासाठी रब्बी ज्वारी, गहू, हरभरा, करडई, जवस, तीळ सहा पिकांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये भाग घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे पिकाखालील किमान 10 आर (0.10 हेक्टर) क्षेत्र आवश्यक आहे.

तालुक्यामध्ये ज्या पिकाखालील लागवड क्षेत्र 1 हजार हेक्टरहून अधिक आहे अशा सर्व पिकांकरीता पीक स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. पीकस्पर्धेसाठी तालुका पातळीवर सर्वसाधारण गटातील किमान 10 स्पर्धक तर आदिवासी गटातील किमान 5 स्पर्धकांचा सहभाग आवश्यक आहे. यामध्ये भाग घेण्यासाठी प्रति शेतकरी प्रतिपिक 300 रुपये प्रवेश शुल्क राहील. तालुका पातळीवर स्पर्धेच्या निकालावरुन पुढे जिल्हा, विभाग व राज्य पातळीवरील बक्षिसे जाहीर केली जाणार आहेत.

एक शेतकरी एकापेक्षा अधिक पिकांसाठी स्पर्धेत भाग घेऊ शकेल. तालुका पातळीवर एकदाच प्रवेश शुल्क भरून पीक कापणी वरुन आलेल्या उत्पादकतेच्या निकालानुसार त्याची तालुका, जिल्हा, विभाग व राज्य पातळीवर निवड केली जाणार आहे.

सर्वसाधारण व आदिवासी गटांकरीता तालुका पातळीकरीता पहिले 5 हजार रुपये, दुसरे 3 हजार, तिसरे 2 हजार रुपये, जिल्हा पातळीकरीता पहिले 10 हजार रुपये, दुसरे 7 हजार तर तिसरे बक्षीस 5 हजार रुपये, विभागीय पातळीकरीता पहिले 25 हजार, दुसरे 20 हजार, तिसरे 15 हजार रुपये आणि राज्य पातळीकरीता पहिले 50 हजार, दुसरे 40 हजार, तिसरे 30 हजार रुपये असे बक्षीस असणार आहे. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीकस्पर्धेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.