राजेश क्षीरसागरांचं बंड शमलं! महाविकास आघाडीला मिळाला दिलासा 

कोल्हापूर – महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमध्ये कोल्हापूर उत्तर मतदार संघातून काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत जाधव हे विजयी झाले होते. मात्र डिसेंबर महिन्यात त्यांचे अकाली निधन झाले. त्यानंतर आता या मतदारसंघासाठी पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. भाजपने ही निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी केली असून महाविकास आघाडी देखील ही जागा जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे.

दरम्यान, भाजप विरुद्ध कॉंग्रेस असा सामना होईल असे वाटत असताना शिवशक्ती सेनेकडून करुणा शर्मा-मुंडे आणि आम आदमी पक्ष देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. दरम्यान, भाजपकडून सत्यजित कदम यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर काँग्रेसकडून दिवंगत चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव (Jayashree Jadhav) यांना उमेदवारी दिली आहे.

दरम्यान, ही जागा शिवसेनेला सोडल्याने शिवसेनेचे नेते राजेश क्षीरसागर हे नाराज असल्याची चर्चा होती. यातूनच राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) गेल्या दोन दिवसांपासून नॉट रिचेबल होते. त्यामुळे महाविकास आघाडीच्या गोटात खळबळ माजली होती. मात्र आता आघाडीला थोडा दिलासा मिळाला आहे. क्षीरसागर यांनी कार्यकर्त्यांना आदेशाप्रमाणे काम करत संयम ठेवण्याचं आवाहन केलं आहे.

उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे यांच्याशी प्रामाणिक होतो आणि राहणार आहे. दोन दिवसांपासून काँग्रेसला मतदारसंघ सोडल्यामुळं कार्यकर्ते  आणि पदाधिकाऱ्यांची जी भावना आहे.  ती उद्धव ठाकरे यांना कळवली आहे.  2024 ला ही जागा आपल्याला मिळेल, असं वरिष्ठांनी सांगितलं आहे. त्यामुळं पक्ष आदेशाप्रमाणं काम करुया असं राजेश क्षीरसागर  म्हणाले.