‘देशात सर्वात महाग वीज आणि पेट्रोल महाराष्ट्रात विकले जात असताना ह्यांना फक्त दुसऱ्यांचे पक्ष फोडण्यात जास्त रस आहे’

पुणे – मशिदींवरील भोंगे काढून न टाकल्यास त्यासमोर स्पीकरवर हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) लावण्याची भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढी पाडव्याच्या दिवशी झालेल्या मेळाव्यामध्ये घेतली होती. त्यानुसार काही भागात मनसे कार्यकर्त्यांनी हनुमान चालिसेचा जाप देखील सुरू केला.

दरम्यान, मनसेचे पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे(Vasant More) यांनी मात्र या भूमिकेच्या विरोधात भूमिका घेत शहरात भोंगे लावणार नसल्याचं जाहीर केलं. त्यामुळे मनसेमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याचं चित्र निर्माण झालं होतं. त्याचाच परिणाम म्हणून मोरे यांची पुणे शहर अध्यक्षपदावरून उचलबांगडी करण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे.

राज ठाकरेंनी पत्र काढत साईनाथ बाबर (Sainath Babar) यांची पुणे शहरअध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, मोरे यांना पदमुक्त केल्यानंतर आता त्यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेत चढाओढ लागल्याचे पाहायला मिळत आहे. यातच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी मोरेंना आज फोन केला असल्याची माहिती समोर येत आहे. ”शिवसेनेत येण्याबाबत विचार करावा,” अशी ऑफर मुख्यमंत्र्यांनी मोरेंना दिली असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, राष्ट्रवादी आणि शिवसेना वसंत मोरेच्या संपर्कात असल्याचे सांगितले जात आहे. आता शेवटी वसंत मोरे यांच्या पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

एका बाजूला हे सर्व सुरु असताना दुसऱ्या बाजूला मनसेचे आमदार राजू पाटील (Raju patil) यांनी मोरे यांना फोडण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांवर टीकास्त्र सोडले आहे. ते म्हणाले, देशात सर्वात महागडी वीज व महागडे पेट्रॅाल हे महाराष्ट्र राज्य विकत आहेत, त्यावर मार्ग काढण्याऐवजी ह्यांना दुसऱ्यांचे पक्ष फोडण्यात जास्त रस आहे….अप्पलपोटे पणाचे उत्तम उदाहरण ! असं पाटील यांनी म्हटले आहे.