मातोश्रीला खोके नवीन नाहीत, आम्हाला तोंड उघडायला लावू नका – रामदास कदम

Mumbai –  मातोश्रीला खोके नवीन नाहीत. मातोश्रीत किती मिठाईचे खोके गेले, हे आम्हाला माहिती आहे, असं रामदास कदम यांनी म्हटलं आहे.तसंच शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याचा अधिकार एकनाथ शिंदे यांना असल्याचं म्हणत शिंदे गटातील नेते रामदास कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.

बाळासाहेबांच्या विचारांशी उद्धव ठाकरे यांनी गद्दारी केली आहे. त्यांनी बाळासाहेबांच्या विचाराशी पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले. त्यांना बाळासाहेबांचे नाव घेण्याचा तरी अधिकार आहे का? असा थेट सवाल रामदास कदम यांनी केला आहे. सुरवातीला त्यांनी आव्हान दिले होते, गुवाहाटीला गेलेत त्यांनी मतदारसंघात पाय ठेऊन दाखवा. नंतर म्हणाले वरळीतून जाऊन दाखवा. मग म्हणतात विधाभवनात पाऊल ठेऊन दाखवा. आता त्यांच्या नाकावर टिच्चून आमदार सगळीकडे गेले. तुमचं काय योगदान, ते फक्त आता बोलण्यापुरते आहे, असा टोला रामदास कदम यांनी लगावला.

खोके..खोके… खोके बोलताय. हे त्यांनी बोलावं यासारखे दुसरे आश्चर्य नाही. आतापर्यंत मातोश्रीवर किती मिठाईचे खोके गेले, याबद्दल आता आम्हाला तोंड उघडायला लावू नका, असा थेट इशाराच रामदास कदम यांनी दिला आहे. ज्याला कावीळ होते त्याला सगळं जग पिवळं दिसतं. एक बोट दुसरीकडे दाखवता तेव्हा चार बोटं स्वतःकडे असतात याचे भान ठेवा, असं म्हणत माजी मंत्री रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंना जोरदार टोला लगावला आहे.