दिग्विजय बागल आपला हा माज नक्की उतरवला जाईल : स्वाभिमानी

सोलापूर : राज्यात कायद्याचा धाक उरला आहे कि नाही असा सवाल उपस्थित करण्याची वेळ आली आहे. कारण सत्ताधारी नेते सत्तेच्या धुंदीत आता जनतेला मारहाण करू लागल्याचे चित्र आहे. थकीत एफआरपी (FRP) मागण्यासाठी गेलेले युवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांना करमाळा तालुक्यातील भिलारवाडी येथील श्री मकाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष दिग्वीजय बागल यांनी मारहाण केली. ही घटना शनिवारी (ता. ११ डिसेंबर) दुपारी चारच्या सुमारास घडली.

उसाची थकीत एफआरपीची मागणी करण्यासाठी युवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे हे मकाई साखर कारखान्यावर गेले होते. त्यावेळी कारखान्याचे अध्यक्ष दिग्वीजय बागल यांनी रणदिवे यांच्यावर हात उचलला. त्यावेळी उपस्थितांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना थांबवण्यात आले. दिग्विजय बागल हे शिवसेना नेत्या रश्मी बागल यांचे बंधू आहेत.

विशेष म्हणजे एका व्हिडीओमध्ये बगल हे स्वभिमानीच्या नेत्यांवर हात उचलताना दिसत असूनही मी कोणालाही मारहाण केली नाही, असे सांगत माझ्या विरोधकांकडून माझे राजकीय करिअर उद्ध्वस्त करण्याच्या हेतूने या लोकांना कारखान्यावर पाठवले होते, असे कारखान्याचे अध्यक्ष बागल यांनी सांगितले. दरम्यान, आता या प्रकरणी दोन्ही बाजूने गुन्हे दाखल झाले आहेत.

दरम्यान, आता या प्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटना युवाआघाडीचे राज्यप्रवक्ता रणजित बागल यांनी अतिशय संतप्त अशी प्रतिक्रिया दिली आहे. दिग्विजय बागल आपला हा माज नक्की उतरवला जाईल असं त्यांनी म्हटलं आहे.

बागल म्हणाले, करमाळा येथे ऊसबिलांबाबत जाब विचारण्यासाठी आमचे करमाळ्याचे पदाधिकारी गेले असता मकाई साखर कारखान्याचा चेअरमन दिग्विजय बागल यांच्याकडून स्वाभिमानी युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे व इतर स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांना धक्काबुक्की करण्यात आली.. ऊसबिले न देता कारखाना सुरू असल्याबाबत निवेदन देण्यास गेलेल्या आमच्या पदाधिकाऱ्यांना स्वतः व गुंडांकरवी जी मारहाण केली आहे याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे..

विशेष म्हणजे हे चेअरमन शिवसेनेचे नेते आहे.. मुख्यमंत्री आदरणीय उध्दवजी ठाकरे साहेब आपले मुजोर कार्यकर्ते वेळीच आवरा.. सत्तेची ही मस्ती नक्कीच उतरवली जाईल.. राज्यभरातील स्वाभिमानीचे पदाधिकाऱ्यांसह आम्ही दिग्विजय बागल ला जाब विचारल्या शिवाय राहणार नाही.. हा माज नक्कीच उतरवला जाईल.. स्वाभिमानीचे सर्व पदाधिकारी विजय रणदिवे करमाळ्याचे पदाधिकारी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत.. दिग्विजय बागलांना नक्कीच शेतकरी व सभासद धडा शिकवतील..