आम्हाला तोंड उघडायला भाग पाडू नका, आता आमच्यासाठी हा विषय संपला – संजय राऊत

कोल्हापूर – राज्यसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी पत्रकार परिषद घेत मोठा आरोप केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी शब्द मोडला, असा दावा छत्रपती संभाजी राजे यांनी केला. पुढील स्थिती पाहता आपण निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. पण ही माघार नाही, असं संभाजीराजे छत्रपती यांनी स्पष्ट केलं आहे.

संभाजीराजेंच्या या आरोपामुळे शिवसेना संभाजीराजे समर्थक आणि भाजपच्या निशाण्यावर आली आहे. राजेंनी माघार घेतल्यानंतर शिवसेनेवर टीका होऊ लागल्यानंतर आता शिवसेनेकडून खासदार संजय राऊत यांनी विरोधकांना कोल्हापूरमधून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. सोबतच मुख्यमंत्र्यांना आरोपाच्या पिंजऱ्यात उभं करणाऱ्या राजेंनाही संजय राऊत यांनी टोला लगावला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज हे कुणाच्या मालकीचे नाहीत. महाराज संपूर्ण विश्वाचे आहेत. 42 मतांचा प्रश्न होता, राजकारण करत असताना कोणत्या ना कोणत्या पक्षाचा हात धरावा लागतो. यापूर्वी पक्षप्रवेश केलेला नाही का ? अशी विचारणा करत आम्हाला तोंड उघडायला भाग पाडू नका, असे राऊत म्हणाले. संभाजीराजे यांनी काल मन मोकळं केलं, आता आमच्यासाठी हा विषय संपल्याचे ते म्हणाले.