‘राजसाहेब ठाकरेंच्या केसाला जरी धक्का लागला तर मात्र, महाराष्ट्र  पेटल्याशिवाय राहणार नाही’

मुंबई – मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS president Raj Thackeray) यांच्या अयोध्या (Ayodhya) दौऱ्यासाठी पक्षाकडून जय्यत तयारी सुरु असताना दुसरीकडे उत्तर प्रदेशात मात्र त्यांना रोखण्याची तयारी सुरु झाली आहे. उत्तर भारतीयांची जाहीरपणे माफी मागितल्यशिवाय त्यांना अयोध्येत घुसू देणार नाही, असा इशारा देत भाजपाचे खासदार बृजभूषण शरण सिंह (BJP MP Brijbhushan Sharan Singh) यांनी दिला आहे.

या सर्व घडामोडी घडत असताना आता मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांना  धमकीचं एक पत्र आलं आहे ते हिंदीत आहे मात्र, त्यात उर्दू शब्दांचाही उल्लेख असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, बाळा नांदगावकर यांना धमकीचं पत्र आलं आहे. या संदर्भात त्यांनी आज राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची सकाळी भेट घेतली. गृहमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर बाळा नांदगावकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली.

अजानच्या विरोधातील भूमिकेचा उल्लेख धमकीच्या पत्रात आहे. हे पत्र कुणाकडून आलं आहे याबाबत मला कल्पना नाहीये. गृहमंत्र्यांची या संदर्भात भेट घेतली. गृहमंत्र्यांनी मला सांगितलं की, पोलीस आयुक्तांसोबत तात्काळ बोलतो आणि त्यानुसार ते पोलीस आयुक्तांसोबत बोलले. मी इतकेच सांगू इच्चितो की, बाळा नांदगावकर ठीक आहे पण राजसाहेब ठाकरेंच्या केसाला जरी धक्का लागला तर मात्र, महाराष्ट्र पूर्ण पेटल्याशिवाय राहणार नाही. याची दखल राज्य सरकारने घ्यावी असंही बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे.

जे पत्र आलं आहे त्यावर पोलीस दखल घेतील. पत्र हिंदीमध्ये आहे आणि त्यात काही उर्दूचे शब्द सुद्धा आहेत. राज ठाकरेंच्या सुरक्षेबाबत केंद्र आणि राज्य सरकारने दखल घ्यावी, भोंग्यांबाबतच्या भूमिका थांबवावी असं पत्रात म्हटलं असल्याचंही बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे.