नाल्यात गाळाचे ढिगारे आणि सत्ताधारी फरार; आशिष शेलार यांच्या नेतृत्वात नालेसफाईच्या पाहणीला सुरूवात
मुंबई – भाजपाने ( BJP ) रेटा वाढवला म्हणून अखेर नालेसफाईच्या कामांना एप्रिलच्या पहिल्या आठवडयात सुरूवात होते आहे. अद्याप नाल्यात गाळाचे ढिगारे कायम असून सत्ताधारी फरार असे दुर्दैवी चित्र पहायला मिळते आहे, अशी टिका करीत भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार ( Ashish Shelar ) यांनी आज नालेसफाईच्या कामांची पाहणी दौरा केला.
भाजपाच्या स्थापना दिना निमित्ताने 6 एप्रिल ते 14 एप्रिल हा सेवा सप्ताह साजरा केला जात असून मुंबईकराच्या ( Mumbaikar ) दृष्टीने नालेसफाईची कामे महत्वाची असल्याने ही कामे पारदर्शी पध्दतीने पुर्ण व्हावीत जेणेकरून मुंबईकरांना पुराचा फटका बसणार नाही यासाठी, यावेळी भाजपा सेवा सप्ताहमध्ये नालेसफाईच्या कामांची पाहणी करणार आहे. आज भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार यांच्या नेतृत्वात नालेसफाईच्या कामांच्या पाहणी दौ-याला सुरूवात करण्यात आली. यावेळी महापालिका गटनेते प्रभाकर शिंदे, पक्षनेते विनोद मिश्रा, प्रवक्ते भालचंद्र शिरसाट यांच्यासह नगरसेवक अभिजित सामंत, अलका केरकर, स्वप्ना म्हात्रे, हेतल गाला, पंकज यादव, उज्वला मोडक आणि एच पश्चिम महापालिका वॉर्डचे सहाय्यक आयुक्त विनायक विसपुते आदी सहभागी झाले होते.
आज खार गझदर बांध साऊथ एव्हेन्यू नाल्यापासून दौ-याला सरुवात करण्यात आली. त्यानंतर नॉर्थ एव्हेन्यू, एस. एन. डी. टी नाला, मोगरा नाला, मेघवाडी नाला, कोलडोंगरी नाला या नाल्यांची पाहणी करण्यात आली. एस.एन.डी.टी नाला सोडला तर अद्याप कुठेही कामाला सुरूवात झालेली नाही. सर्वच ठिकाणी नाल्यात गाळाचे ढिग पडून असून अवघ्या दिड महिन्याच्या कालालवधीत ही कामे पुर्ण करावी लागणार आहेत. त्यामुळे उपस्थित अधिका-यांना या कामांना गती द्या, अशी सूचना आमदार अॅड आशिष शेलार यांनी केली.
दरम्यान, याबाबत बोलताना शेलार म्हणाले की, प्रशासनाने नालेसफाईच्या कामांचा 130 कोटींचा प्रस्ताव स्थायी समितीमध्ये 9 मार्चलाच आणला पण त्याला मंजूरी न देताच सत्ताधारी मुदत संपली आणि फरार झाले. त्यानंतर भाजपाने आवाज उठवल्यावर सदर प्रस्ताव पालिका आयुक्त्ांनी मंजूर केला. वास्तविक मार्च मध्ये या प्रस्तावाला मंजूरी मिळून मार्चच्या अखेरच्या आठवडयातच कामांना सुरूवात होणे अपेक्षीत होते. त्याला यावेळी सत्ताधा-यांमुळे विलंब झाला आहे. आता कामे सुरू होत आहे, आम्ही त्यावर लक्ष ठेवून राहणार आहोत. आज 7 एप्रिल उजाडले तरी नाल्यात गाळाचे ढिग कायम आहेत. गतवर्षी पेक्षा 30 कोटी अधिकचे या कामांना देण्यात आले आहेत त्यामुळे ही नालेसफाई आहे की हातसफाई आहे, असा सवालही आमदार अॅड आशिष शेलार यांनी केला आहे. तसेच ज्यांच्यावर जबाबदारी आहे त्या माजी महापौर, स्थायी समिती अध्यक्ष कुठे आहेत. या कामांवर लक्ष ठेवण्यापासून हे पळ काढत आहेत, अशी टिका ही यावेळी आमदार शेलार यांनी केली.