“…तर मी पवारांची औलाद असल्याचे सांगणार नाही”, अजित पवार संतापले

Maharashtra Political Crisis : राज्याच्या राजकारणात अजित पवार (Ajit Pawar) यांनी भूकंप घडवून आणला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) पडलेल्या फुटीनंतर अजित पवार विरुद्ध शरद पवार (Sharad Pawar) यांच्यामधला संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर आज राष्ट्रवादीसाठी महत्त्वाचा होता. आज राष्ट्रवादीतील दोन्ही गटाचे मेळावे झाले यात दोन्ही बाजूच्या नेत्यांनी आपली भूमिका कार्यकर्ते आणि नेत्यांच्या समोर मांडली. यावेळी आपल्या जबरदस्त भाषणात अजित यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली.

2004 ला आपले 71 आणि काँग्रेसचे 69 आमदार आले. त्यावेळी मला मोठं स्थान नव्हतं. सोनियाजींनी विलासरावांना सांगितलं राष्ट्रवादीला मुख्यमंत्रिपद द्यावं लागेल. विलासरावांनी विचारलं तुमच्यात कोण होईल? भुजबळसाहेब आर.आर.पाटील प्रमुख नेते म्हणून काम करत होते. माझी त्यावेळी इच्छा नव्हती, कारण हे प्रमुख नेते म्हणून काम करत होते. सगळं आपल्याला मिळालं पाहिजे, असा हव्यास कुणी ठेवू नये. ती संधी मिळाली असती तर राष्ट्रवादीचाच मुख्यमंत्री आजही तुम्हाला दिसला असता. पण चार खाती जास्त घेतली. असं म्हणत अजित पवारांनी खंत व्यक्त केली.

मी महाराष्टाला कधी खोटं बोलणार नाही, खोटे बोलेल तर मी पवारांची औलाद असल्याचे सांगणार नाही म्हणत भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांनी चर्चा केली. पण मला सांगण्यात आले कुणाला काही सांगायचे नाही असे सांगून मला शांत केले, असे अजित पवार म्हणाले.