मोठी बातमी : एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा, महामंडळाने केली भूमिका स्पष्ट

मुंबई : इतिहासातील सर्वाधिक काळ सुरु असलेल्या एस.टी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत आज मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे, या मागणीसाठी २७ ऑक्टोबरपासून एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनाची हाक दिली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे १४ हजार गाड्या स्थानक आणि आगारात उभ्या आहेत. दोन हजार गाड्यांच्या माध्यमातून राज्यात केवळ दहा टक्के एसटी फेऱ्या सुरू आहेत. एसटीच्या विलीनीकरणाचा निर्णय येण्याच्या काही वेळ आधीच महामंडळाकडून एका महत्वाच्या मुद्द्यावर स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे. एसटी संपामुळे महामंडळाचे कोट्यावधी रूपयांचे नुकसान होत असले तरी हे नुकसान कर्तव्यावर रूजू झालेल्या कामगारांकडून वसूल करण्याचा महामंडळाने कोणताही निर्णय घेतलेला नाही, अशी स्पष्टोक्ती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी आज दिली. त्यामुळे निर्णय येण्याआधीच एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

महामंडळाचे स्पष्टीकरण

एसटी महामंडळ राज्य शासनात विलिनीकरण करावे, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. गेल्या तीन महिन्यांहून अधिककाळ सुरु असलेल्या या संपामुळे महामंडळाला कोट्यावधी रूपयांचे नुकसान सोसावे लागत आहे ही वस्तूस्थिती आहे. मात्र, हे नुकसान भरून काढण्यासाठी एसटी कामगारांच्या वेतनात कपात करून वसूल करण्याचा प्रस्ताव महामंडळाच्या विचारधीन आहे, असे वृत्त आज प्रसिद्धी माध्यमांनी प्रसिद्ध केले आहे. वास्तविक, अशा प्रकरणी संपामुळे होणारी महसूली नुकसान भरपाई कामगिरीवर रुजू झालेल्या कामगारांच्या वेतनातून वसूल करण्याचा कोणताही निर्णय महामंडळाने घेतलेला नाही किंवा तसा प्रस्तावही विचारधीन नाही, अशी माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली आहे. तसेच अशा तथ्यहिन वृत्तांवर कामगारांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले.