बंड आपल्या मातीत होत असतो, पळून जाऊन नाही, हा पळपुटेपणा आहे – सुळे

Mumbai – शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Shiv Sena leader and minister Eknath Shinde) यांच्या बंडानंतर राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. एका बाजूला हे सर्व सुरु असताना आता खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांना इडीचे समन्स आले आहे. उद्या 11 वाजता चौकशी साठी त्यांना बोलावण्यात आलं आहे. पत्रावाला चाळ जमीन घोटाळा प्रकरणी हे समन्स बजावण्यात आल्याचं सांगितले जात आहे. दरम्यान, अजून अशी नोटीस मिळाली नाही असं राऊत यांच्याकडून सांगण्यात येत आहे.

दरम्यान, या सर्व घडामोडींवर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी भाष्य केले आहे. त्या म्हणाल्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया देताना बंडखोर आमदारांना पळपुटे असं म्हटलंय. आसाममध्ये गेलेल्या आमदारांना महाराष्ट्रानं निवडून दिलं आहे. ते आसाममध्ये काय करत आहेत? मतदारसंघातील कामं कोण करणार? असा सवाल देखील सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. शिंदे गटाच्या नावाबद्दल विचारलं असता, त्यांनी बाळासाहेबांचं नावच तेवढं मोठं असल्याचं म्हटलं.

बाळासाहेब ठाकरे यांनी स्वत: त्यांचा उत्तराधिकारी कोण हे सांगितलेलं आहे. बाळासाहेबांच्या नंतर उद्धव यांनीच शिवसेना चालवावी हा त्यांनीच घेतलेला निर्णय आहे. त्यामुळे, हे नाव जर कोणी वापरत असेल तर त्यात काही चूक नाही. कारण, ते नावच तेवढं मोठं आहे. पण, हे उसन नाव घेतलं, असं राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.

सध्या पेरणीचा काळ आहे, लोकांनी आपल्या मतदारसंघात यायला हवं. लोकं आपल्याला कशासाठी निवडून देतात, मतदारसंघातील कामं करण्यासाठी, पण हे आसाममध्ये पंचातारांकित हॉटेलमध्ये जाऊन बसले आहेत. बंड आपल्या मातीत होत असतो, पळून जाऊन नाही. हा पळपुटेपणा आहे, हिंदीत एक शब्द आहे भगौडे, असे म्हणत बंडखोर आमदारांना सुप्रिया सुळेंनी पळपुटे असं म्हटलं आहे.