ठाकरे सरकारच्या गृहखात्याचा इंटेलिजन्स ब्युरो फेल; शिंदेंच्या बंडाची साधी खबरही लागली नाही ?

मुंबई – हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा स्वतःला खरा वारसदार मानणाऱ्या शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षनेतृत्वाच्या विरोधात बंडाचा झेंडा हाती घेतला आहे. एकनाथ शिंदे, शिवसेनेच्या ३४ सोबतच ७ अपक्ष अशा एकुण ४१ आमदारांसह गुवाहाटीमध्ये आहेत. शिंदे यांनी दिलेल्या दणक्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. २५ वर्षे राज्य आमचंच राहील असा दावा काही नेत्यांकडून केला जात असताना शिंदे यांच्या यॉर्करमुळे हे नेते त्रिफळाचीत झाल्याचे दिसत आहे.

राज्यात राजकीय भूकंप घडवणाऱ्या शिवसेनेतील आजवरच्या सर्वात मोठ्या बंडानं ठाकरे सरकार (Thackeray Gov) अडचणीत आलं आहे. याचवेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत अनेक आमदार असल्याची चर्चा आहे. शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांची भूमिकाही आता समोर आली आहे. त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबरचं सरकार अमान्य असल्याचं कळत आहे भाजपसोबत (BJP) जाण्यास हे नेते इच्छुक आहेत अशी भूमिका बंडखोर आमदारांनी घेतल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, राज्यात भूकंप घडवणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या बंडाची खबर इंटेलिजन्स ब्युरोला देखील नसल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे, गृहखात्याच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.पोलीस बंदोबस्तात एकनाथ शिंदे यांच्यासह काही आमदार मुंबई सूरत रस्त्याने गुजरातपर्यंत पोहचले असल्याची माहिती समोर आली आहे. तलासरीपर्यंत महाराष्ट्र पोलिसांची सुरक्षा एकनाथ शिंदे यांना होती. त्यानंतर गुजरात पोलिसांच्या सुरक्षेत एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदार सूरतला रवाला झाले. विशेष म्हणजे, इतकी मोठी घडामोड घडत असताना याची कल्पना गृहमंत्री किंवा मुख्यमंत्री कार्यालयाला देण्यात आली नव्हती. त्यामुळे, गृहखात्याच्या कारभारावर आता प्रश्न उपस्थित होत आहे.