अस्वस्थ आत्मे एकनाथ शिंदे यांच्या मानगुटीवर बसून ‘ऑपरेशन कमळ’ घडवीत आहेत – सामना

मुंबई – हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा स्वतःला खरा वारसदार मानणाऱ्या शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षनेतृत्वाच्या विरोधात बंडाचा झेंडा हाती घेतला आहे. एकनाथ शिंदे, शिवसेनेच्या ३४ सोबतच ७ अपक्ष अशा एकुण ४१ आमदारांसह गुवाहाटीमध्ये आहेत. शिंदे यांनी दिलेल्या दणक्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. २५ वर्षे राज्य आमचंच राहील असा दावा काही नेत्यांकडून केला जात असताना शिंदे यांच्या यॉर्करमुळे हे नेते त्रिफळाचीत झाल्याचे दिसत आहे.

राज्यात राजकीय भूकंप घडवणाऱ्या शिवसेनेतील आजवरच्या सर्वात मोठ्या बंडानं ठाकरे सरकार (Thackeray Gov) अडचणीत आलं आहे. याचवेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत अनेक आमदार असल्याची चर्चा आहे. शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांची भूमिकाही आता समोर आली आहे. त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबरचं सरकार अमान्य असल्याचं कळत आहे भाजपसोबत (BJP) जाण्यास हे नेते इच्छुक आहेत अशी भूमिका बंडखोर आमदारांनी घेतल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान,हा संपूर्ण प्रकार म्हणजे ‘महाराष्ट्रावर वार’ असल्याचं शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखामधून म्हटलंय. धर्माच्या मुखवट्याखाली अधर्माशी संग करणाऱ्यांना जनता माफ करील काय?, असं विचारतानाच शिवसेनेनं एकनाथ शिंदेंचा उल्लेख ‘शिवसेनेतील तथाकथित निष्ठावंत’ असा केलाय. त्याचप्रमाणे शिवसेनेनं भाजपाची तुलना ईस्ट इंडिया कंपनीसोबत केलीय.

महाराष्ट्रातील सरकारला खाली खेचण्याची एकही संधी भाजपावाले सोडत नाहीत. अडीच वर्षांपूर्वी अजित पवारांचे प्रकरण पहाटे झाले. त्यात यश आले नाही. आता तेच अस्वस्थ आत्मे एकनाथ शिंदे यांच्या मानगुटीवर बसून ‘ऑपरेशन कमळ’ घडवीत आहेत. काही करून राज्यातील सरकार घालवायचे याच ईर्षेने त्यांना झपाटलेले आहे. राज्यसभा निवडणुकीत सहावी जागा भाजपने कोणत्या छुप्या कारवायांमुळे जिंकली याचा उलगडा आता होत आहे.